Delhi Election Result 2025 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर आता बहुप्रतीक्षित असलेल्या दिल्लीच्या रणसंग्रामात भाजप आणि आपमध्ये काँटे की टक्कर दिसत आहे. सुरुवातीचे कौल समोर येत आहे.एकीकडे मतमोजणी सुरू आहे. या विधानसभेत काँग्रेस किती जागा मिळवू शकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासोबतच, आतापर्यंतचे निकाल पाहिले तर भाजप आघाडीवर दिसून येत आहे तर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर आतिशी या विजयी झाल्या आहेत. निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून पोस्ट करत भाजपचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
यह मोदीजी की गॅरंटी का कमाल है। महाराष्ट्रा पाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाची आणि एनडीएची विजयी घौडदौड सुरूच आहे. त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! दिल्लीकरांवरचे गेली १० वर्षे असलेलं ‘आप’चे संकट या निमित्ताने दूर झाले आहे. दिल्लीच्या विकासावर आलेली ही ‘आपदा’ टळली. त्याचबरोबर, संविधान, मतदान सगळे संकटात असल्याचा खोटा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी पुन्हा एकदा चारी मुंड्या चित केलं आहे. खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली, त्याबद्दल दिल्लीकर मतदारांना मनापासून धन्यवाद! घरोघरी लक्ष्मीची पावले उमटावीत म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेल्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावरही मतदारांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे. आपला देश आर्थिक महासत्ता होण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही, यावरही मतदारांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.
यासोबतच,राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीसुद्धा ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून पोस्ट करत भाजपचे अभिनंदन केले आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन! १५ हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा २० जागांच्या वर देखील गेली नसती. दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत भावना होती. उचित-अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजपासारख्या महाशक्ती विरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक-दोन पाऊल मागे-पुढे घेण्याची गरज होती, परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत, परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली. ही बाब ट्रॅडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी.
हे ही वाचा :
Follow Us