मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणाऱ्या एका प्रवासी बोटीचा भीषण अपघात झाला होता. भारतीय नौदलच्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिल्याने हि बोट उलटली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. त्यात नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या दुर्घटनेतून अद्याप मुंबईत सावरलेली नाही. त्यातच आता मुंबईच्या मढ समुद्रकिनारी एक मासेमारी करणारी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड परिसरात असलेली मढ कोळीवाड्यात मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. काल रात्री १२.०० ते १२.३० च्या सुमारास मढ कोळीवाड्यातील तिसाई बोटीचा दुर्देवी अपघात झाला. या बोटीला एका मालवाहू जहाजाने धडक दिली. त्यामुळे ही बोट उलटली. सुदैवाने त्यावेळी आजूबाजूला काही बोटी असल्याने मासेमारी करण्यासाठी गेलेल्या कोळी लोकांचा जीव वाचला.
मालाडमधील मढ परिसरातील हेमदीप हरिश्चंद्र टिपरी हे नेहमीप्रमाणे मढ कोळीवाडा या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान चायनाच्या एका मालवाहू जहाजाने त्यांच्या मासेमारी करणाऱ्या नौकेला धडक दिली. त्यामुळे ही नौका बुडाली. या नौकेवर असणारे तांडेल/खलाशी यांना बाजूला असलेल्या सवटी ग्रुपच्या नौकांनी सुखरुप बाहेर काढले. तसेच याच ग्रुपच्या आठ बोटीने नौका बांधून आणली. आज ही नौका मढ, तलपशा बंदरात पोहोचण्याचा अंदाज आहे. यावेळी नेव्ही/कोस्ट गार्डचे जहाज बरोबर आहे. तसेच दोन अधिकारी रात्रीपासून नौकांवर मदत करत आहेत.
मुंबईत बुधवारी १८ डिसेंबर दुपारी ४ च्या सुमारास बोटीला अपघात घडला. मुंबईतून एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या नीलकमल या प्रवाशी बोटीला भारतीय नौदल च्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला. यानंतर ती बोट नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली.ही धडक इतर जबरदस्त होती की आधी या बोटीला मोठे भगदाड पडले आणि त्यानंतर काही क्षणात ही बोट बुडाली. या अपघातावेळी बोटीमध्ये १०० पेक्षा अधिक प्रवासी होते. नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९८ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका