पंढरपूर : आज पंढरपूरात आषाढी एकादशीचा मंगलमय दिवस उजाडलेला आहे. याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. यंदा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावचे वारकरी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी सौ. जिजाबाई नवले या वारकरी जोडप्याला शासकीय पूजेत मनाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. त्याच बरोबर राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे.
मुख्यमंत्रीचे सहकुटुंब पंढरपुरात हजर
विठुमाऊलीची शासकीय महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी त्यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते. पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागली आहे. यावेळी मुख्यमंत्री कोणतेही राजकीय कार्यक्रम घेऊ शकणार नाहीत. निवडणूक आयोगाच्या काही अटी-शर्थींवरचा पूजेची परवानगी देण्यात आली होती.
#आषाढीएकादशी निमित्त श्री क्षेत्र #पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. pic.twitter.com/gkmCGgG4Hk
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 10, 2022
महापुजेनंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
ते म्हणाले, “आजचा दिवस हा माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या मंदिरात महापूजा करण्याचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य समजतो. लाखो वारकरी विठू नामाचा जयघोष करत महाराष्ट्रातील देहू, आळंदी, शेगाव आणि पैठण येथून पायी चालत पंढरीच्या पावनभूमीकडे आले आहेत. दरवर्षी न चुकता हे सगळं होत असतं. पण गेल्या दोन वर्षात करोनामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. यावर्षी मोठा उत्साह वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळाला. आज याठिकाणी दहा लाखापेक्षा अधिक वारकरी आले आहेत. त्यांना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देतो.”
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, “राज्यातील शेतकरी, वारकरी, कष्ठकरी, कामकार, शेतमजूर, गुंतवणूकदार, उद्योजक आणि समाजातील प्रत्येक घटकाला हे वर्ष सुखाचं, आनंदाच आणि समृद्धीचं जावो, अशी प्रार्थना मी पांडूरंग चरणी करतो. कोविडचं संकट आता लवकरात लवकर जायला पाहिजे. करोनाची कायमस्वरुपी जाण्याची वेळ आली आहे. पांडुरंगाच्या पुण्याईने ते जाईलं,” असेही ते म्हणाले.