UMC चा अनोखा उपक्रम, पुस्तक प्रदर्शनातून मतदान जनजागृती, पुस्तक खरेदीवर ‘इतकी’ सवलत

UMC चा अनोखा उपक्रम, पुस्तक प्रदर्शनातून मतदान जनजागृती, पुस्तक खरेदीवर ‘इतकी’ सवलत

यंदाच्या महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे हा दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. उल्हासनगर येथील ‘सिंधू भवन’ येथे ‘चला पुस्तकांशी दोस्ती करुया’ या संकल्पनेवर आधारित भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. हे पुस्तक प्रदर्शन १  ते ३ मे या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८  वाजेपर्यंत चालू राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. किशोर गवस आणि उपायुक्त डॉ. सुभाष जाधव उपस्थित राहणार आहेत.

२०२४ हे निवडणुकांचे वर्ष असल्यामुळे मतदान जागृतीसाठी या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकीच एक म्हणजे प्रदर्शनात पुस्तक खरेदीवर १० टक्के सवलत तर मिळणारच आहे; पण ज्या वाचकांकडे मतदान ओळखपत्र असेल अशा वाचकांना अतिरिक्त १० टक्के म्हणजे एकूण २० टक्के सवलत पुस्तक खरेदीवर मिळणार आहे. उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख यांनी ही माहिती दिली. इतकेच नाही तर, ज्या वाचकांकडे मतदान ओळखपत्र नसेल त्यांना मतदान ओळखपत्र मिळवण्यासाठी काय करायला लागेल याची माहिती देण्यासाठी विशेष कक्ष या पुस्तक प्रदर्शनात असणार आहे. या कक्षात मतदान ओळखपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरु केल्यास त्या वाचकांना देखील पुस्तक खरेदीवर अतिरिक्त दहा टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे. त्यासोबतच, या प्रदर्शनात मतदार जनजागृतीसाठी एक प्रतिज्ञा लिहून घेतली जाणार आहे आणि त्यापैकी एका भाग्यवान विजेत्याला दर दिवशी विशेष पारितोषिक दिले जाईल. मतदार जनजागृती करत असतानाच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीही विशेष उपक्रम या प्रदर्शनाच्या निमित्ताने उल्हासनगर महानगरपालिकेकडून राबवला जाणार आहे, असेही उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले.

या प्रदर्शनात उल्हासनगर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील विविध शाळांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रमात विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्काराबरोबरच त्यांना विशेष प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पालकांचा, शिक्षकांचा आणि मुख्याध्यापकांचाही सत्कार केला जाणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे ही यामागील संकल्पना आहे. उल्हासनगरचे रहिवासी अभिषेक टाले भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानिमित्त त्यांचाही विशेष सत्कार या प्रदर्शनात होईल. नव्या पिढीसमोर एक आदर्श निर्माण व्हावा हा त्यामागील उद्देश. या तीन दिवसीय पुस्तक प्रदर्शनास आपण भेट देऊन पुस्तकांशी दोस्ती करावी, असे आवाहनही उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे.

हे ही वाचा:

अखेर ठरलं! उत्तर पश्चिममधून वायकरांना उमेदवारी जाहीर

‘यांचं’ स्वतःच कर्तृत्व काहीच नाही, Girish Mahajan यांची MVA वर जोरदार टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version