राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये मागील काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला (Congress) धक्का बसला आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, असा दावा केला जात आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढण्यात (Buldhana News) काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
बुलढाण्याच्या खामगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ३ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले दिलीप सानंदा (Dilip Sananda) हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. या चर्चा राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दिलीप सानंदा हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या वाटेवर होते. त्यांच्या भाजपमधील पक्ष प्रवेशनंतर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. केंदीय मंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी दिलीप सानंदा हे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. त्यामुळे माजी आमदार दिलीप सानंदा हे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दिलीप सानंदा हे दिवंगत विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय मानले जायचे. त्यांनी १९९९ साली खामगाव विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळेपासून ते सलग तीन पंचवार्षिक काँग्रेसचे आमदार म्हणून काम करत होते.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्यातून गेली तेव्हा दिलीप सानंदा यांनी सक्रिय सहभाग नोंदवला नाही. त्याचा ठपका अनेक काँग्रेस नेत्यांनी नोंदवला आहे.त्यानंतर ते गेल्या अनेक महिन्यांपासून राजकारणात सक्रिय नव्हते. त्यामुळे आता लवकरच दिलीप सानंदा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
हे ही वाचा:
क्रिती आणि पुलकित लवकरच अडकणार लग्नबंधनात,लग्नाची हटके पत्रिका व्हायरल
अमित शाहांनी महाराष्ट्रात येऊन राज्यातील जनतेचं मनोरंजन केले; संजय राऊतांनी भाजपवर साधला निशाणा