Saturday, July 27, 2024

Latest Posts

शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, हा छत्रपती शिवरायांचा आदेश- Dr. Amol Kolhe

नामांकनासाठी पाठविलेल्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्रातील शिववारशांचा समावेश असून या किल्ल्यांना आता जागतिक ओळख मिळू शकणार आहे.

तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला आणि महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांना युनेस्कोच्या २०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठविला आहे. याबाबत आनंद व्यक्त करतांना डॉ. अमोल कोल्हे  यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेयर केली आहे. हा क्षण अभिमानाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले डॉ. अमोल कोल्हे ? 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचे जिवंत साक्षीदार असलेल्या गड किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्याचा प्रस्ताव भारत सरकारच्या वतीने देण्यात आला आहे. आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील किल्ले शिवनेरीसह रायगड, तोरणा, लोहगड, साल्हेर, खांदेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या एकूण १२ किल्ल्यांसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. किल्ले संवर्धनाच्या दृष्टीने ही अतिशय सकारात्मक बाब असून याबद्दल भारत सरकारचे मनापासून आभार.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचेही संवर्धन व्हावे

गड किल्ल्यांच्या संवर्धनासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीचे, विचारांचेही संवर्धन व्हावे अशी स्वराज्यातील बळीराजाची मागणी आहे. “शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये” हा छत्रपती शिवरायांचा आदेश अंमलात आणून केंद्र सरकारने अन्यायकारक कांदा निर्यातबंदी रद्द करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती.

युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले. गेली अनेक शतके ताठ मानेने उभे असलेल्या या गड किल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाची मोहोर उमटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी (Shivneri), लोहगड, खांदेरी, रायगड (Raigad), राजगड, प्रतापगड (Pratapgad), सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग (Sindhudurg) या ११ आणि तामिळनाडू (Tamilnadu) च्या जिंजी किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादी (World Heritage List) मध्ये नामांकनासाठी पाठविण्यात आला आहे. नामांकनासाठी पाठविलेल्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्रातील शिववारशांचा समावेश असून या किल्ल्यांना आता जागतिक ओळख मिळू शकणार आहे. युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Latest Posts

Don't Miss