लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दोन दिवसांआधी शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मोठी घोषणा केली आहे. विजय शिवतारे हे बारामतीमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. महायुतीकडून बारामतीची जागा अजित पवार गटाला देण्यात येणार आहे. मात्र विजय शिवतारे यांनी केलेल्या घोषणेमुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना भेटीसाठी बोलावले होते. त्यांच्यामध्ये तासाभराची बैठक झाली. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला. शिवाय महायुतीमध्ये ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी काम करायचे, अशी समज मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना दिली.
विजय शिवतारे म्हणाले,मुख्यमंत्र्यांना भेटून स्थानिक परिस्थिती काय आहे. लोकांची मनस्थिती काय आहे. पवार विरुद्ध पवार यात जे ४८ टक्के लोक पवारांच्या विरोधात आहे. त्यांना मतदानाची संधी द्यायला हवी आणि सध्याची स्थानिक नेत्यांची इच्छा काय आहे, याची माहिती दिल्याचं शिवतारे म्हणाले. बारामती लोकसभा निवडणूक लढणार यावर पुढे गेलो आहोत. तरीही आपण या सगळ्या परिस्थितीचा विचार महायुतीने करावा, अशी इच्छा शिवतारेंनी व्यक्त केली आहे.
बारामतीची जागा ही अजित पवार गटाची आहे. त्यांच्या या जागेसाठी महायुती निर्णय घेईल. राजकारणात काही मर्यादा ओलांडू नये, त्यामुळे मी माझ्या मर्यादा कधीही ओलांडणार नाही. माझं म्हणणं, माझी परिस्थिती आणि बारामतीतील परिस्थिती मी मुख्यमंत्र्यांना सांगितली आहे. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांशी चर्चा करुन निर्णय देतील, असे विजय शिवतारे म्हणाले.
हे ही वाचा:
Manoj Kotak यांचा पत्ता कोणी आणि का कापला? हुकमी खासदार घरी बसला! | Manoj Kotak | Loksabha Election
स्मिता तांबेची प्रमुख भूमिका असलेला ‘कासरा’ ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात
Follow Us