जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी एक संकेतस्थळासाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. पुलवामा हल्ल्यासंदर्भामध्ये सत्यपाल मलिक यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सत्यपाल मलिक यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लक्ष्य केलं असून त्यांनी आपल्याला यावरून गप्प राहायला सांगितले असे सत्यपाल मलिक म्हणाले. राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. एका मुलाखतीमध्ये करण थापर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. सीआरपीएफनं केंद्रीय गृहमंत्रालयाकडे एअरक्राफ्टची मागणी केली होती. परंतु त्यांनी नकार दिला. मला जर त्यांनी विचारणा केली असती तर मी त्यांना एअरक्राफ्ट दिले असते. फक्त पाच एअरक्राफ्टची गरज होती. मी त्याच संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडले आहे. आपण जर त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं, तर हे घडले नसते. तर त्यांनी मला सांगितले की तुम्ही आता शांत राहा असे सत्यपाल मलिक म्हणाले.
या दाव्यावरून संजय राऊतांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, हा मोठा गौप्यस्फोट नाही. ही गोष्ट देशाला आधीच माहिती होती की पुलवामा हल्ल्यात काहीतरी घोटाळा आहे. यात तेव्हा लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणारे तेव्हाचे सत्ताधारी निवडणुका जिंकण्यासाठी काहीतरी गडबड करणार आहेत असे म्हंटले जात होते. आम्ही हे प्रश्न वारंवार विचारायचा प्रयत्न केला की पुलवामामध्ये ३०० किलो आरडीएक्स पोहोचले कसे? पुलवामाच्या रस्त्यावरून कधीही सुरक्षा कर्मचारी प्रवास करत नाहीत. त्यांना विमान का दिले गेले नाही? असा प्रश्न संजय राऊतांनी प्रश्न विचारला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयची नोटीस आल्यावरूनही संजय राऊतांनी टीका केली. अरविंद केजरीवाल यांना सीबीआयची नोटीस आली आहे. सीबीआय-ईडीचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेसला तोडण्याचाही प्रयत्न आहेत आणि तेजस्वी यादव यांनाही ईडी आणि सीबीआय बोलवत आहेत. आमच्या विरोधामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांना लावलं आहे. हे सरकार आहे का ? हे तर एक टोळी चालवत आहेत ते गॅंग चालवत आहेत असे संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआयकडून चौकशी
अग्निशमन सेवा सप्ताहास आरंभ, आयुक्त अभिजीत बांगर यांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली