Saturday, July 27, 2024

Latest Posts

आमच्या फंदात न पडता स्वतःच्या ढोंगी हिंदुत्वाकडे लक्ष द्या, ठाकरे गटाचे सूचक वक्तव्य

आणि एक... राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे! देशासाठी लढणाऱ्या साऱ्यांना सोबत घेऊन जाणारं आमचं हिंदुत्व आहे! आणि ते प्रबोधनकारांपासून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतलं आणि तोच वारसा उद्धवसाहेब पुढे चालवत आहेत!

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक पोस्ट करण्यात आली आहे. ज्यात त्यांनी भाजप महाराष्ट्रला उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलताना सरकारवर टीकास्त्र उगारले होते. त्यानंतर, भाजपच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून त्यांना टोकण्यात आले होते आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भाजपला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

ट्वीटमध्ये नेमके काय आहे? 

कोकणासाठी उद्धव ठाकरे ह्यांनी मुख्यमंत्री असताना काय केलं हे कोकणातली जनता जाणतेच, मग ते निसर्ग चक्रीवादळ असो की तौक्ते चक्रीवादळ असो! कोकण वाचवण्यासाठी नाणार-बारसूबद्दल घेतलेली भूमिका असो, की कोकणाला भरभरून केलेली मदत असो! उद्धव ठाकरे सातत्याने कोकणात येत राहिले, कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहिले! पण त्याचवेळी कोकणात चक्रीवादळ आलेलं असताना पंतप्रधानांनी ना मदत केली ना तिथे फिरकले, पण त्याचवेळी इतर राज्यातल्या निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून तिथल्या चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीला मात्र धावले. कोकणी बांधव सगळं पाहतो आणि लक्षात ठेवतो!

काय होते भाजपचे ट्वीट?  

मुख्यमंत्री असताना कोकणातील मराठी माणसाला वाऱ्यावर सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना निवडणुका तोंडावर असताना कोकणाची आठवण झाली. उद्धव ठाकरे तुम्ही फक्त भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, प्रत्यक्ष कृतीत मात्र तुम्हाला औरंग्याबद्दलचं प्रेम दिसून येते. भाजपचे सुरूवातीपासून भगव्यावर प्रेम आहे आणि कायम राहणार. सत्तेसाठी सोनिया सेनेपुढे गुडघे टेकून भगव्याला छेद देण्याचे पाप कुणी केले? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. देवेंद्रजींवर पाव उपमुख्यमंत्री म्हणून टीका करण्याआधी तुमच्या शिल्लक सेनेची काय अवस्था झाली ते बघा. सच्चा शिवसैनिकानं तुमची साथ कधीच सोडलीय. आता तुमच्याकडे पाव सेनाही उरलेली नाही, असे म्हणत भाजपने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? 

उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावेळी सावंतवाडीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना मला सांगायचं आहे, तुम्ही पाव मुख्यमंत्री झालात. पुन्हा येईल घोषणा करतांना मोठे होता. पण आता तुम्ही त्यांना काय म्हणता? घोषणा करतांना काय होते आणि आता झाले चिराग, एवढा तो टरबूज आणि त्याचे झाले चिराग! एवढे करूनसुद्धा तुम्हाला काही पचत नाही. तरी तुम्ही फोडाफोडीचे धंदे करता. मी आजारी असतांना काही हालचाल करू शकत नव्हतो, तेव्हा तुम्ही हुडी वगैरे घालून रात्रीच्या ज्या करामती केल्या, त्याच आता तुमच्या पक्षावर उलटल्या आहेत. तुमचाच पक्ष संपला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

Latest Posts

Don't Miss