एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारणात घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे काही आमदारांसह भाजपमध्ये जाण्याची चर्चां सर्वत्र सुरु आहे. त्यात आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका करत निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ व अपक्ष ७ अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले. त्यामुळे राज्याच्या राजकरणात आता अनेक चर्चांना उधाण आले आहे. राजकारणातील अनेक मंडळी सुरु असलेल्या घडामोडींवर आपल्या प्रतिक्रीया देताना दिसत आहेत.
यासंबंधी नारायण राणे यांनी ट्विटर वर एक ट्विट केले आहे जे सध्या खूप चर्चेत आहे. या ट्विट मध्ये संजय राऊत यांचावर राणेंनी टीका केली आहे. राणे ट्विट मध्ये म्हणतात, “शिवसेनेला संपवल्याचा राऊतांना आनंद झाला असेल. राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘संजय राऊत खुश! कारण त्यांना शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा आणि शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी आणि दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने.”
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे काही आमदारांसोबत सुरतमध्ये पोहचले. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेनं भाजपासोबत येऊन सरकार स्थापन करावं अशी मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रच्या राजकारणात पुढे कोणत्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.