देशात भाजपा सरकारच्या विरोधात प्रचंड चिड असून शेतकरी, तरुणाई बरबाद करायची व्यवस्था मोदी सरकारची आहे. भाजपा सरकारविरोधात जनतेत संतापाची लाट असून राहुलजी गांधी यांनी मांडलेल्या भूमिकेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रेला देशात प्रतिसाद मिळालाच पण महाराष्ट्रानेही अभूतपूर्व प्रतिसाद देऊन ही पदयात्रा यशस्वी केली आहे. आता हाच संदेश घेऊन हाथ से हाथ जोडो अभियान राज्यात राबविले जाणार असून हे अभियान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी ऊर्जा निर्माण करणारे आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. नागपूरच्या राणी कोठी येथे प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत नाना पटोले बोलत होते.
बैठकीच्या सुरुवातीला भारत जोडो यात्रेत शहीद झालेले सेवादलाचे ज्येष्ठ नेते के.के. पांडे यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नाना पटोले पुढे म्हणाले की, राहुलजी गांधी यांना बदनाम करण्यासाठी भाजपाने करोडो रुपये खर्च केले पण जनता या अपप्रचाराला बळी पडली नाही. भारत जोडो यात्रेतून राहुलजी गांधी यांचे नेतृत्व व खरी ओळख जनतेला झाली असून जनताच मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहीली आहे. २०१९ मध्ये राज्यात ४४ आमदार विजयी झाले व काँग्रेसचे भविष्य काय अशी चर्चा होती पण आता वातावरण बदललेले. सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेसला चांगले यश मिळेल अशी स्थिती आहे. मुंबई व आसपासच्या परिसरातही काँग्रेस संघटन वाढवून जास्तीत जास्त आमदार, खासदार निवडून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काँग्रेस पक्षाचा शिपाई म्हणून काम करा. लोकांना जोडायचे असेल तर संवाद वाढवला पाहिजे, एक परिवार म्हणून प्रत्येकाला सोबत घेऊन जाऊ आणि अखिल भारतीय काँग्रसने दिलेले हाथ से हाथ जोडो अभियान महाराष्ट्रात यशस्वीपणे करून दाखवू.
यावेळी बोलताना हाथ से हाथ जोडो अभियानाचे प्रभारी पल्लम राजू म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला. यात्रेचा उद्देश सर्वांना माहित आहे आता आपण हाथ से हाथ जोडो अभियान हाती घेतले आहे. या अभियानासाठी स्थानिक पातळीवर योग्य नियोजन करावे व अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा. प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी निरिक्षकावर असेल. राज्यातील सहा विभागात एक-एक कॅम्प ठेवून अभियानाची माहिती दिली जाईल. जनतेशी संवाद साधणे, संघटन मजबुतीकरण व राष्ट्रीय व राज्य स्तरीय मुद्दे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हे अभियान एक चांगली संधी आहे.
कार्यकारिणीत मांडलेले ठराव-
१) भारत जोडो यात्रेबद्दल मा. राहुलजी गांधी यांचे अभिनंदन करणारा व महाराष्ट्रातील जनतेने या यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार व्यक्त करणारा ठराव मांडून संमत करण्यात आला. हा ठराव माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी मांडला व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी त्याला अनुमोदन दिले.
२) पदयात्रा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत केल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार व्यक्त करणारा ठराव मांडून तो संमत करण्यात आला. हा ठराव माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मांडला आणि प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी त्याला अनुमोदन दिले.
३) केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी असून त्याचा निषेध करणारा ठराव मांडून संमत करण्यात आला. माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी मांडला व प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे यांनी अनुमोदन दिले.
४) राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व वीजबिल माफी देण्यात यावी हा ठरावही मांडून संमत करण्यात आला. हा ठराव माजी मंत्री डॉ नितीन राऊत यांनी मांडला व माजी मंत्री सुनील केदार यांनी ठरावाला अनुमोदन दिले.
५) गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्प उभा करुन राज्यातील तरुणांना रोजगार मिळावा व राज्याला महसूल मिळेला यासाठीचा ठराव मांडून तोही संमत करण्यात आला. आ. अभिजीत वंजारी यांनी हा ठराव मांडला व आ. वजाहत मिर्झा यांनी ठरावाला अनुमोदन दिले. याशिवाय SC- ST प्रर्वगातील प्रमोशन, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातीगत जनगणना करावी, तसेच नोकर भरतीचा करावी. हे ठरावही मांडून एकमताने संमत करण्यात आले.
हे ही वाचा:
शर्मिला ठाकरेंनी केलं जेनेलियाचं भरभरून कौतुक, थेट केलं थिएटरचं बुक
Angarki Sankashti Chaturthi २०२३ : वर्षाची पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या इतिहास