लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ तारखेला पार पडला असून मतांची टक्केवारी समाधानकारक दिसत नाही. जनतेमध्ये मतदान करण्याचा उत्साह आहे परंतु, राज्यात सगळीकडे ४० अंशांपेक्षा जास्त तपमान असल्याने मतदानासाठी घराबाहेर पडणे आरोग्याच्या दृष्टीनेही त्रासदायक आहे. बहुतांश मतदान केंद्रात सोयीसुविधा नाहीत, मतदारांना त्यांचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या आवारात तात्पुरते शेड बांधावे तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
यासंदर्भात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले म्हणाले की, राज्यात ४० अंशांच्या वर उन्हाचा पारा असल्याने या कडक उन्हात मतदान करणे नागरिकांना त्रासदायक होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या उन्हाचा जास्त त्रास होतो. कडक उन्हामुळे उष्माघातासारखा जीवघेणा प्रकार ओढवू शकतो. मतदानासाठी तासनतास रांगा लावाव्या लागतात, कडक उन्हात मतदानासाठी रांगा लावणे हे सुद्धा त्रासदायक आहे. नागरिकांचा या कडक उन्हापासून बचाव व्हावा यासाठी निवडणुक आयोगाने सुविधा पुरवल्या पाहिजेत. उन्हापासून बचाव करण्याची सोय उपलब्ध झाली तर मतदानाची टक्केवारीही वाढण्यास मदत होईल, असेही नाना पटोले म्हणाले.
पहिल्या टप्प्यात देशभरात झालं ‘फक्त’ इतके टक्के मतदान
महाराष्ट्रात ५ ठिकाणी म्हणजेच भंडारा-गोंदिया (Bhandara-Gondiya), चंद्रपूर(Chandrapur), गडचिरोली-चिमूर (Gadchiroli-Chimur), नागपूर (Nagpur) आणि रामटेक (Ramtek) येथे निवडणूक पार पडली. नागरिकांनी सकाळपासून लांबच-लांब रांगा मतदान केंद्राभोवती लावल्या होत्या. भंडारा-गोंदिया मध्ये ६४.०८ टक्के इतकं मतदान पार पडलं. चंद्रपूर मध्ये ६०.३५ टक्के इतकं मतदान पार पडलं असून गडचिरोली-चिमूर मध्ये ६९.४३ टक्के, नागपूर मध्ये ५४.४६ टक्के, रामटेक मध्ये ५९.५८ टक्के मतदान पार पडलं. सर्वात कमी मतदान नागपूरमध्ये तर सर्वात जास्त गडचिरोली-चिमूर येथे दिसून येत आहे. मतदानाचा दुसरा टप्पा २६ एप्रिल रोजी पार पडेल. यात १३ राज्यांमधील ८९ संसदीय मतदारसंघांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यात ८ ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. यात बुलढाणा (Buldhana), अकोला (Akola), अमरावती (Amravati), यवतमाळ वाशीम (Yavatmal Washim), हिंगोली (Hingoli), वर्धा (Wardha), नांदेड (Nanded) आणि परभणी (Parbhani) या ठिकाणी मतदान पार पडेल. नागरिकांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.
हे ही वाचा:
घरात घुसून मारण्याची भाषा करणाऱ्या Narendra Modi ना चीन घरात घुसल्याचे कसे दिसत नाही? – Nana Patole
Follow Us