शिरूर तालुक्यातील आंबळे गावात गरोदर महिलांच्या आहारामध्ये अळ्या आढळल्या असून या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिरूर मतदार संघातील अमोल कोल्हे यांनी या प्रकारानंतर सरकारला प्रश्न केले आहेत. प्रशासन वाऱ्यावरती सोडून सत्ताधाऱ्यांनी आपले लक्ष फक्त केवळ आणि केवळ निवडणुकीवर केंद्रित केलं असून, गरोदर मातांचे आणि बाळांचे पोषण होण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या कंत्राटदारांचे पोषण सुरु आहे, अशी टीका अमोल कोल्हेंनी केली. अमोल कोल्हे म्हणाले ‘सत्ताधाऱ्यांचं लक्ष केवळ निवडणुकीवर असून त्यांनी प्रशासनाला वाऱ्यावर सोडले आहे. गरोदर महिलांचे आणि त्यांच्या बाळांचे पोषण होण्यापेक्षा कंत्राटदारांचे पोषण चालू आहे. नक्की पोषण कुणाचं चालू आहे हे मात्र कळत नाहीये. बाजारातून खराब माल पडलेल्या भावाने उचलून चढ्या भावाने विकावा. अशा कंत्राटदारांवर कारवाई व्हावी’. या संपूर्ण प्रकारची चौकशी व्हावी अशी मागणी देखील अमोल कोल्हेंनी केली.
शिरूर तालुक्यातील आरोग्य विभाग गरोदर महिलांसाठी आहार देत असतो. त्यांची काळजी घेण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो. पोषण आहार देण्यामागचे उद्दिष्ट गरोदर मातेचे आणि बाळाचे तंदुरुस्त आरोग्य हे आहे. असे असूनही शिरूर तालुक्यातील आंबळे येथे नुकतेच या आहारात अळ्या आणि सोनकिडे आढळून आले. आहारातील गूळ आणि काजूमध्ये किडे आढळून आले. हाच आहार गरोदर महिलांना दिल्याचा दिसून आले. गरोदर महिलांच्या आरोग्यासाठी हे उपक्रम राबवण्यात येतात आणि त्यातच जर असा काही आढळून येत असेल तर गरोदर महिलांच्या जिवास धोका असल्याची शक्यता नाकारता येत नाही.