Sunday, May 19, 2024

Latest Posts

26/11 Mumbai Attack : अन् धावणारी मुंबई हादरुन गेली; कटू आठवणींना १४ वर्षे पूर्ण, नेमकं काय घडलं होतं?

२६/११ अर्थात २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला असा भ्याड हल्ला होता, जो मुंबईची ओळख बनू पाहत असला तरी मुंबईला कधीच ती आपली ओळख बनू द्यायची नव्हती. या घटनेला १४ वर्षं उलटली, तरी

२६/११ अर्थात २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला असा भ्याड हल्ला होता, जो मुंबईची ओळख बनू पाहत असला तरी मुंबईला कधीच ती आपली ओळख बनू द्यायची नव्हती. या घटनेला १४ वर्षं उलटली, तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात याच्या कटू आठवणी जिवंत आहेत.

२६ नोव्हेंबरचा दिवस अनेकांसाठी इतर दिवसांप्रमाणे सामान्य होता. २००८ साली मात्र मुंबईकर आणि संपूर्ण देशासाठी हा काळा दिवस ठरला. २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ल्याला आज १४ वर्षे पूर्ण होत आहेत. १४ वर्षांनंतरही आज २६/११ मुंबई हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी, कटू आठवणी प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम आहेत. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा परिणाम संपूर्ण जगभरात पाहायला मिळाले. या हल्ल्यात भारतीयांसह अनेक परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला होता. मुंबई हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं. २००८ मध्ये पाकिस्तानमधून दहा दहशतवादी समुद्राच्या मार्गे मुंबईत घुसले होते. लष्कर ए तोयबाच्या या अतिरेक्यांनी मुंबईची शान म्हणून ओळख असेलल्या ताज हॉटेलसह ६ ठिकाणी हल्ला केला होता.

१. लिओपोल्ड कॅफे –
मुंबई पोलीस आणि तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दहशतवादी २ दोन गटांमध्ये विभागले होते. लिओपोल्ड कॅफेमध्ये पोहोचलेल्या दोन दहशतवाद्यांनी तिथं अंदाधुंद गोळीबार सुरु केला. या कॅफेमध्ये बरेच फॉरेनर्स येतात. कारण हा कॅफे परदेशी पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्या दिवशी कॅफेत हजर असणाऱ्या लोकांना काही कळायच्या आतच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला आणि तिथून पळ काढला. अधिकृत आकडेवारीनुसार, लिओपोल्ड कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारात १० जण मृत्युमुखी पडले होते.

२. छत्रपती शिवाजी टर्मिनस – 
छत्रपती शिवाजी टर्मिनस हे रेल्वे स्थानक नेहमीच लोकांनी गजबजलेलं असतं. ते देशातील सर्वांत व्यग्र रेल्वे स्थानकांपैकी एक स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर त्यादिवशी अत्यंत क्रूर पद्धतीने दहशत पसरवण्यात आली.या स्थानकावर त्या दिवशी या मोठ्या संख्येने प्रवासी हजर होते. दहशतवाद्यांनी तिथंही अंदाधुंद गोळीबार केला. इथं जो गोळीबार झाला त्यात अजमल अमीर कसाब आणि इस्माईल खान यांचा सहभाग होता. त्यानंतर पोलिसांनी अजमल अमीर कसाबला पकडलं, पण त्याचा दुसरा साथीदार इस्माईल खान मारला गेला. या गोळीबारात ५८ लोक मृत्युमुखी पडले होते.

३. ओबेरॉय हॉटेल –
बिझनेस क्लासमध्ये खूप फेमस आहे. दहशवादी या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर दारूगोळा घेऊन घुसले.असं म्हटलं जातं की, त्यावेळी हॉटेलमध्ये जवळपास 350 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. आत घुसल्यानंतर दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं होतं. नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या जवानांनी या हॉटेलमध्ये दोन्ही दहशतवाद्यांना ठार केलं.

४. ताजमहाल हॉटेल –
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची एक ओळख जी कधीच विसरता येणार नाही ती म्हणजे, ताजमहाल हॉटेलच्या घुमटावर लागलेली आग. आजही हा हल्ला आठवायचा म्हटलं तर त्या जळत्या घुमटाचा फोटो आपल्याला डोळ्यांपुढं दिसतो. हे हॉटेल जवळपास १०५ वर्षं जुनं आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेलं हे ताजमहाल हॉटेल परदेशी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. इथूनच समोर पसरलेला अरबी समुद्र दिसतो. त्या रात्री हॉटेलमध्ये जेवणं सुरू होती आणि बरेच लोक हॉटेलमध्ये जमले होते, अचानक दशतवादी आत घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सरकारी आकडेवारीनुसार, हॉटेल ताजमध्ये एकूण ३१ लोक मृत्यमुखी पडले. आणि इथंच चार दशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.

५. कामा हॉस्पिटल –
कामा हॉस्पिटल हे एक चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल १८८८० साली बांधण्यात आलं असून एका श्रीमंत व्यापाऱ्याने याची बांधणी केली होती. एकूण आलेल्या दशतवाद्यांपैकी चार जणांनी पोलिस व्हॅन चोरली आणि त्यानंतर गोळीबार सुरू ठेवला. याच कारने ते कामा हॉस्पिटलमध्ये घुसले. कामा हॉस्पिटलबाहेर झालेल्या चकमकीत दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर शहीद झाले.

६. नरिमन हाऊस –
या सगळ्यात दहशतवाद्यांनी नरिमन हाऊसलाही टार्गेट केलं. नरिमन हाऊसमध्ये घुसून दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं.ज्या इमारतीत दहशतवादी घुसले ती इमारत ज्यू लोकांच्या मदतीसाठी बांधलेलं एक सेंटर आहे. याठिकाणी ज्यू पर्यटक थांबलेले असतात. या सेंटरमध्ये ज्यू धर्मग्रंथांची एक मोठी लायब्ररी आहे. या ठिकाणी कारवाई करण्यासाठी एनएसजी कमांडो हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पलीकडे लागून असलेल्या इमारतीवर उतरले. या कारवाईत दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं.

पाकिस्तानमधून आलेल्या या दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस इथे झाले. अतिरेक्यांनी एक टॅक्सी बॉम्बने उडवली होती. पोलिसांना मदत म्हणून रॅपिड अॅक्शन फोर्स (आरपीएफ), मरिन कमांडो आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) कमांडो यांना पाचारण करण्यात आलं. परंतु अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना तीन दिवस लागले. जवळपास ६० तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती. या हल्ल्यादरम्यान हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी शहीद झाले. दहा दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याला जिंवत पकडण्यात पोलिसांना यश आलं. हा दहशतवादी म्हणजे अजमल आमीर कसाब. तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या अंगावर गोळ्या झेलून कसाबला जिवंत पकडलं. परंतु तुकाराम ओंबळे शहीद झाले. त्यांच्यामुळेच अजमल कसाबला जिवंत पकडता आलं आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणण्यास मदत झाली.

हे ही वाचा:

२६/११ च्या पार्श्वभूमीवर सामनातून ईशान्येकडील हिंसाचारावर भाष्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss