टाईम महाराष्ट्राचे मुख्य संपादक राजेश कोचरेकर यांनी २५ ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन बाबुराव विचारे यांच्याशी बातचीत केली. या विशेष मुलाखतीत राजन विचारे यांनी अनेक गोष्टींवर भाष्य करत गौप्यस्फोट केले आहेत. यावेळी राजन विचारे यांनी ठाण्यातील विकासकामांचा आढावा देत काही गोष्टींचा खुलासा केला आहे.
आनंद दिघेंचा नवरात्र उत्सव जो होता, हा एकच होता संपूर्ण महाराष्ट्रात त्याची चर्चा व्हायची. एकनाथ शिंदे आणि राजन विचारे हे आनंद दिघेंचे शिष्य होते. दोघांनीही आता नवरात्र उत्सव वेगवेगळे केले. दोघांचेही दोन उत्सव ठाणेकरांच्या समोर आहेत. तुम्हा दोघानांही काय गरज पडली की, आनंद दिघेंकडे असणारा भक्तांचा गोफ स्वतःकडे वळवण्यासाठी दोघांनीही स्वतःचा स्वतंत्र चैत्र नवरात्र बनवण्याचं काय कारण?
असा सवाल विचारल्यानंतर राजन विचारे म्हणाले की, मला असं वाटतंय, जसा उत्सव मी करतो तसाच एकनाथ शिंदेही करतात. उत्सव हे गल्लोगल्लीत चालू राहायला हवेत. उत्सव मर्यादित राहता कामा नये. दिघे सरांमुळे या शहराची ओळख होती कारण, या ठाणे शहराची संस्कृती जपण्याचं काम आम्ही गेली कित्येक वर्ष करत आहोत. मी महापौर असताना हा उत्सव त्या ठिकाणी चालू केला होता. दिघे साहेबांकडे हा उत्सव नवरात्रीमध्ये असतो तर माझ्याकडे चैत्र नवरात्रीमध्ये असतो. उत्सव वेगवेगळे आहेत. तिकडे तो नवरात्र उत्सव चालू आणि इकडे माझा नवरात्र उत्सव चालू असा नाहीये. आणि त्या ठिकाणी रविंद्र फाटकांची पण देवी आहे, राजन विचारेंची देवी आहे, प्रताप सरनाईकांचीही देवी आहे आणि एकनाथ शिंदेंची देखील देवी आहे. उलट मी त्यांना सांगितलं की, तुमच्या मतदारसंघामध्ये नवरात्र उत्सव करा म्हणून. उत्सव हा एकट्याचा थोडी असतो प्रत्येक ठिकाणी हिंदुत्वाचे उत्सव झाले पाहिजेत. मग ते कुणीही करा. देवीच्या गोष्टींमध्ये राजकारण कधीच आणायला नाही पाहिजे, आणि मी ते आणत देखील नाही, अशी माहिती टाईम महाराष्ट्रसोबत बोलताना राजन विचारे यांनी दिली.
जसे तुम्ही म्हणालात हिंदुत्वाची कास धरायला हवी. तुम्ही एक अध्यात्मिक नेते म्हणून ओळखले जातात. या निवडणुकीला सामोरे जाताना तुमच्या पक्षाने हिंदुत्वाला जी काही बगल दिलेली आहे. तुम्ही ठाण्यातून एक हिंदुत्ववादी नेते बनून वावरताना किंवा दिघेंचा शिष्य म्हणून वावरताना या सगळ्यांचं किती दडपण असणार आहे?
या प्रश्नावर राजन विचारे म्हणाले की, शिवसेना कधीच हिंदुत्वाला बगल देऊ शकणार नाही. हिंदुत्व आमचा श्वास आहे. आणि हिंदुत्वासाठी आम्ही काहीही करू शकतो. पहिल्या दिवसापासून हिंदुत्व आणि शिवसेनेचे नातं आहे. राम मंदिरासाठीसुद्धा आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो. आमचं पहिलं वाक्य होतं, पहिले मंदिर फिर सरकार. त्यांच्या आशीर्वादाने सरकार देखील आलं. त्यावेळी उद्धवसाहेब मुख्यमंत्रीदेखील झाले. त्यामुळे हे सर्व तुम्ही काय कर्म करता, जनतेशी कसे वागता किंवा तुमचं काय योगदान आहे त्या दृष्टिकोनातून लक्षात घ्यायला हवं.
ठाण्यातील लोकसभेची निवडणूक ही दोन महापौरांची आहे. तुम्ही महापौर असताना ११६ विरुद्ध ० अश्या मताने निर्विवाद रीतीने महापौर झाला होतात. त्याच्या आधी ठाण्यातला महापौर हा घोडेबाजारचा एक उत्तम नमुना असायचा. पहिला बिनविरोध महापौर होण्याचा मान तुम्हाला मिळाला. सॅटिससारख्या काही गोष्टी तुम्ही केल्या. तुमची महापौर पदाची कारकीर्द सर्वांनीच पहिली. ते एक महापौर कसा असावा याच उत्तम उदाहरण होत. आता तुमचे दुसरे सहकारी नरेश म्हस्के तुमच्यासोबत मुकाबला करणार आहेत. ते ही महापौर आहेत. हा मुकाबला ठाणेकरांसाठी कसा असणार आहे?
त्यांच मी काहीही सांगू शकत नाही पण माझं जे आहे मी गेली ३५ वर्ष राजकारणामध्ये काम करत आहे. मी २० वर्ष नगरसेवक होतो. अडीच वर्ष मी महापौर होतो. त्यानंतर मी ५ वर्ष आमदार होतो. १० वर्ष मी ठाणे लोकसभेमध्ये काम केलं आहे. तुम्ही देखील पाहिलं असेल की, ३५ वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये कुणी माझ्याकडे असं बोट देखील दाखवू शकत नाही. हे पथ्य आम्ही पाळलं आहे. मी कुठल्या कॉन्ट्रोवर्सी मध्ये देखील कधी नव्हतो. आपलं काम भलं आणि आपण भलं. ज्या पद्धतीने या पक्षावरती ही वेळ आणून ठेवली होती आणि जी काय गद्दारी झाली होती आणि या गद्दारीच्या सच्चाईची लढाई लढण्यासाठी हा राजन विचारे आज ठामपणे उभा आहे, आणि माझ्या ठाण्यातली, नवी मुंबईतली आणि मीरा भाईंदरमधील सर्व जनता माझ्याबरोबर आहे. सर्व जातीधर्माचे लोक माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. आणि मी केलेल्या ३५ वर्षाच्या कामामध्ये ठाणे शहर असेल, नवी मुंबई असेल किंवा मीरा भाईंदर असेल या सर्वांमध्ये मी विकासासाठी योगदान दिल आहे. मी केलेली कामे मी लोकांसमोर ठेवलेली आहेत. ठाणे आणि मुलुंड च्या मध्ये जे नवीन स्टेशन बनतय पहिलेच मी पार्लमेंटमध्ये भाषण करून त्याची मागणी करून बजेट मध्ये त्याची तरतूद करून त्यावेळी हायकोर्टामध्ये केस देखील दाखल केली होती. त्यावेळी सुरेश प्रभू रेल्वेमंत्री होते. ते काम आम्ही सुरु केलं आहे. सगळे प्रोजेक्ट्स असतील ते हे करीन ते करीन बोलून होत नाहीत, तर यासाठी पाठपुरावा करावा लागतो. ठाणे हे एक ऐतिहासिक स्टेशन आहे. दिघा स्टेशन माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं काम आहे. शंभर वर्ष तेथील लोक आठवण काढतील की आपल्या खासदाराने दिघा स्टेशन मुंबई शहरासाठी केलं होत. खूप प्रोजेक्ट्स आहेत असे जसे की, कोपरी ब्रिज असेल किंवा इतर काही प्रोजेक्ट्स असतील संपूर्ण लेखाजोगा मी मतदारांसमोर ठेवला आहे. मी केलेल्या विकासाच्या आधारावर नागरिक मला पुन्हा निवडून देतील. असा विश्वास राजन विचारे यांनी टाईम महाराष्ट्रच्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.
हे ही वाचा:
मराठी मतदारांना आवाहन करण्यामागे राजकीय हेतू आहे का? Chitra Wagh यांचा Renuka Shahane यांना सवाल
Uddhav Thackeray मतांसाठी लाचार, आज Balasaheb Thackeray असते तर… Devendra Fadnavis यांचे ताशेरे !
Follow Us