मराठा आरक्षणाचा लढा अखेर संपला आहे. नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्युस पिऊन उपोषण सोडले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांचे कौतुक केले. त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मलाही गोरगरीब समाजाचे दुख आणि वेदना याची कल्पना आहे. म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचे काम हा एकनाथ शिंदे करत आहे. दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यपद्धती आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
५४ लाख कुणबी नोंदी सापडलेल्या कुटुंबाला प्रमाणपत्र द्यावी, कुणबी प्रमाणपत्र नोंद सापडणाऱ्या कुटुंबाला सरसकट आरक्षण द्यावे आणि तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्यावे अशा तीन मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या होत्या. त्या मागण्या मान्य करण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: राजपत्र घेऊन नवी मुंबईत मनोज जरांगे यांची भेट घेतली. सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांच्यावर गुलाल उधळला. मराठा समाजासाठी ज्याने संघर्ष केला ते संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील याचे मी अभिनंदन करतो. फक्त राज्याचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष मराठा आंदोलनाकडे लागले होते. आपण अतिशय संयमाने, शिस्तीत आंदोलन केले. कुठेही आंदोलनाला गालबोट न लावता यशस्वी केले, त्याबद्दलही आपले अभिनंदन करतो. आपल्या आंदोलनाचा कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली. मी सुद्धा एका शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोरगरीब समाजाचे दुख आणि वेदना याची कल्पना आहे. म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचे काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यपद्धती आहे, असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.
आज धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नुकतीच झाली आहे. या दोन्ही गुरुंचा आशिर्वाद माझ्या पाठिशी आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या भूमीत आज हा ऐतिहासिक लढा यशस्वी पार पडला आहे. त्यांनाही मी वंदन करतो. आमचे सरकार हे तुमचे सरकार आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे सरकार आहे. आम्ही कधीही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले. मराठा समाजाचा जो संघर्ष आहे, मराठ्यांनी अनेकांना मोठे केले, मोठमोठी पदे अनेकांना मिळाली. परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना, संधी आली तेव्हा त्यांनी संधी द्यायला हवी होती. पण आजचा दिवस हा तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
हे ही वाचा:
मराठा आरक्षणाची लढाई अखेर संपली, एका रात्री नेमकं काय झालं?
‘नकली राजकीय हिंदूत्ववाद्यांपासून सावध’… मिरारोड प्रकरणावर किरण मानेंची खास पोस्ट