मुंबई: महापालिका निवडणुका तयारीच्या पार्श्वूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सज्ज झाले आहेत. उद्या १३ जुलै रोजी मनसे चा मेळावा आयोजित करण्यात आला होता. परंतू काही दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे हा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मेळावा रद्द करण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राज्यातील पूर स्थितीबद्दल ही म्हंटलं आहे. या पूर परिस्थितीत नागरिकांना मदत करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
पत्रात राज ठाकरे यांनी म्हंटले, तुम्हाला जरा थोड्या तातडीनं कळवतो आहे. आपण वास्तविक उद्या एक मेळावा आयोजित केला होता. ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं दिसत आहे. जनजीवन तर विस्कळीत झालं आहे. त्यामुळे हा मेळावा रद्द करण्यात येत आहे. असं राज ठाकरे म्हणाले. त्यांनी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना स्वतःची काळजी घेण्यासोबतच अतिवृषटीमुळे ज्या लोकांना त्रास होतोय त्यांना ही मदत करण्याचे आवाहन केले आहे.
अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येऊ नये म्हणून ही हा मेळावा रद्द केल्याचे राज ठाकरे म्हणाले. मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे. अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच कळवली जाईल. अशा आशयाचं हे पत्र आहे.