Saturday, July 27, 2024

Latest Posts

‘मातोश्री’बाहेरील हनुमान चालिसाप्रकरणी नवनीत आणि रवी राणांना कोर्टाचा मोठा धक्का

'मातोश्री'बाहेरील हनुमान चालीसा पठण आंदोलनप्रकरणी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी घराबाहेर हनुमान चालिसा पठण प्रकरणात कोर्टाने निर्णय दिला आहे. रवी राणा आणि नवनीत राणा यांची गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली आहे. राणा दाम्पत्याला हा मोठा धक्का आहे.

‘मातोश्री’बाहेरील हनुमान चालीसा पठण आंदोलनप्रकरणी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी राणा दाम्पत्याने याचिका दाखल केली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळली. खार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा हे आरोपी आहेत.

एफआयआर दाखल होण्यापूर्वीच केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा राणांचा दावा होता. कोर्टाने हा दावा फेटाळला. अतिरीक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आपला निकाल राखून ठेवला होता. तो निकाल आज जाहीर केला.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पुढील सुनावणीत कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालात ५ जानेवारीला आरोप निश्चितीची प्रक्रिया होणार आहे. दोषमुक्ती यचिका फेटाळल्यानंतर कोर्टाकडून खटल्याच्या कारवाईला सुरूवात झाली आहे.

काय आहे प्रकरण?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार पत्नी नवनीत यांनी जाहीर केलं होतं. त्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या राणा दाम्पत्याला कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचं कारण सांगत मुंबई पोलिसांनी हे आंदोलन न करण्याबाबत सीआरपीसी कलम 192अंतर्गत नोटीस बजावली होती.

पोलिसांच्या नोटिशीनंतरही याबद्दल मीडियात प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलिसांनी आयपीसी कलम १५३A, ३४, ३७ सह मुंबई पोलीस कायदा १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यातच नंतर आयपीसी कलम १२४A अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हाही वाढवण्यात आला.

आंदोलनाच्या दिवशी संध्याकाळी या प्रकरणात राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक करून त्यांना वांद्रे दंडाधिकारी कोर्टापुढे हजर केलं. तेव्हा कोर्टानं त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार राणा दाम्पत्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. पुढे मुंबई सत्र न्यायालयानं या दोघांना सशर्त जामीन मंजूर केला होता.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss