आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा काही प्रमाणात सुटला असला तरी काही जागांवर मात्र वाद सुटण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जागेवरही महायुतीत अजून निर्णय झाला नाही. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना नेते किरण सामंत या दोघांनीही रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर आपला हक्क सांगितला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नारायण राणे आणि किरण सामंत हे दोघेही इच्छूक असून अद्याप या जागेवरील वाद सुटण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. अश्यातच, किरण सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
किरण सामंत यांनी रविवार, १४ एप्रिलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी किरण सामंत यांना केंद्रातून अंतिम निर्णय येईपर्यंत शांत राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह हे येत्या दोन दिवसांत रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत निर्णय घेणार असून तोपर्यंत नारायण राणे आणि किरण सामंत यांना शांत राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मिळत आहे.
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी नारायण राणे आणि किरण सामंत दोघेही आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. नारायण राणे यांनी तर त्यांच्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. दुसरीकडे, किरण सामंत हे सुद्धा मागे हटायला तयार नसून त्यांनी उमेदवारीचे चार अर्ज विकत घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर तणाव निर्माण झाल्याचे दिसत आहे. आता, अमित शहा याबद्दल निर्णय घेणार असल्याच्या बातम्या येत असून येत्या दोन दिवसांत या जागांचा निकाल मार्गी लागतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हे ही वाचा:
Eknath Shinde यांनी रडीचा डाव बंद करावा, Raju Shetti यांचे वक्तव्य
‘स्वतः च्या पुतण्याचे डोके फोडले आणि रडत राहिले,’ BJP नेत्याचे Nana Patole यांच्यावर गंभीर आरोप
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.