Saturday, July 27, 2024

Latest Posts

बेकायदेशीर मार्गाने स्थापन झालेलं सरकार सुव्यवस्था राखण्यासाठी अपयशी – Nana Patole

२ फेब्रुवारीच्या रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून शिंदे गटाचे (Shinde Group) कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार झाला. या प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाडसह दोन जण जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री घडलेल्या या संपूर्ण प्रकारामुळे शहरचं नव्हे तर अख्खा ठाणे जिल्हा हादरला असून या घटनेनंतर उल्हासनगरसह कल्याणमध्ये तणावाचं वातावरण असून शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापले आहेत. या घटनेमुळे राजकीय मंडळींकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.

सत्तेची मस्ती महाराष्ट्र उतरवल्याशिवाय राहणार नाही

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि माध्यमांशी संवाद साधताना या घटनेमुळे  सरकारचा निषेध केला आहे. उल्हासनगर येथे शिंदे गटाच्या कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला आहे. उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच हा गोळीबार झाल्याच्या बातम्या येत आहेत. गणपत गायकवाडांनी झाडलेल्या गोळ्यांनी जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळते. बेकायदेशीर मार्गाने स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस यांचं सरकार राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अपयशी ठरल्याचे वारंवार सिद्ध होत असताना आता भाजपाचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शहर अध्यक्षावर पोलिस ठाण्यातच गोळीबार करतात ही गंभीर घटना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी कांही दिवस सत्तेत राहणं म्हणजे महाराष्ट्रासमोरील संकट आहे, हे या घटनेवरून सिद्ध होतं. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षावर गोळीबार होत असेल तर सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल महाराष्ट्रात? भाजपाच्या आमदारांची पोलिस ठाण्यात गोळीबार करण्यापर्यंत मजल जात असेल तर यामागील सत्तेची मस्ती महाराष्ट्र उतरवल्याशिवाय राहणार नाही, असे यावेळी नाना पटोले म्हणाले.

सत्तेच्या गर्मीचा हा प्रत्यय आहे

राज्यातलं सरकार लुटेरं आणि डाकू आहे. असं आम्ही अनेकदा बोललो आहे. जो कोणी आमदाराचं ऐकत नसेल मग आयपीएस अधिकारी किंवा कोणी असेल त्याची तात्काळ बदली करा. पोलिसांवर भयानक दबाव कधी नव्हे ते आता आपण बघत आहोत. पोलिसांनी कोणतेही काम करु नये, अशा पद्धतीचं दबावतंत्र गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडून पोलिसांवर दबाव आहे. फुले यांच्या विचाराला येड्याचं सरकार संपवण्याचं काम करत आहेत. अशा सरकारला तात्काळ बरखास्त करायला पाहिजे. सत्तेच्या गर्मीचा हा प्रत्यय आहे, आम्ही स्वच्छ आणि राम राज्य चालवतो म्हणतात, पण आता या घटनेवरून जनाची नव्हे तर मनाची लाज बाळगायला हवी. महाराष्ट्रात गुंड राज्य या सरकारने राबविले आहे. असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हे ही वाचा:

उल्हासनगर प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर, केली मोठी घोषणा

सोशल मीडियावर आरक्षणाबत प्रतिक्रिया दिल्याप्रकरणी जालन्यातील २७ शिक्षकांना नोटीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss