मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र्र दौरा करत आहेत. अनेक ठिकाणी जाऊन ते सभा घेत आहेत. मराठा आरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ते सभा घेत आहेत. आज त्यांच्या तीन सभा परभणीमध्ये होत्या. त्यातील पहिली सभा ही सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आली. या सभेदरम्यान बोलताना मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. सरकारने आता तरी भानावर यावं, असे म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केली आहे.
पहिल्यांदा आमचा कार्यक्रम करून बघितला, आता नोटीसी देऊन जर काही करण्याचा प्रयत्न केला तर, तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे मुश्किल होईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी परभणीतील सेलू येथे झालेल्या सभेत दिला आहे. त्यानंतर ते जरांगे म्हणाले, सरकारने तडजोडीसाठी हालचाल करावी पुढे यावे, २४ तारखेनंतर सरकारने सरकारचा रस्ता धरावा, आम्ही आमचे आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा जरांगे म्हणाले. आम्ही मुंबईला जाणार नाही, तशी घोषणाही दिली नाही मात्र तरीही आमच्या पोरांना नोटीसा देण्यात आल्या आहेत, जर तुमची इच्छाच असेल तर आम्ही नक्कीच मुंबई बघायला येऊ. आम्ही कायद्याच्या मार्गाने आरक्षण मागत असू अन् तुम्ही नोटिसा देत असाल तर मग आम्ही काय करणार. एखाद्याची गाडी अडवली तर, सगळ्याच गाड्या तिकडे घेऊन जायच्या. मात्र पोलिसांना सहकार्य करा त्यांचा दोष नाही वरच्यांचा आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
मी मराठ्यांसाठी अन् आरक्षणासाठी मरायला भीत नाही. मी ४ महिने झाले घराचा उंबरा शिवला नाही. माझी मायाबापाशी गद्दारी करणारी औलाद नाही. हा लढा जिंकायचा आहे. माझं कुटुंब हे मराठा समाज आहे, समाजासाठी मरायची ही तयारी ठेवली आहे. एकजूट फुटू देऊ नका राजकारण्यांचे ऐकू नका, असे म्हणत मराठा समाजाला एकत्र येण्याचे आव्हान मनोज जरांगे यांनी केलं आहे. आता पोरांचे वाटोळे नाही होऊ द्यायचं नाही. तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावू लढा. मला डॉक्टरने सांगितलं आराम करा, पण आता आरक्षण मिळण्याची वेळ आलीय. माझं शरीर आता मला साथ देत नाहीये, पण मी थांबणार नाही. मी एक इंच ही मागे हटणार नाही. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
पुण्यात भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ, हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी
संजय राऊतांची मोठी घोषणा, ठाकरेंची शिवसेना लोकसभेत २३ जागा लढणार