नवी मुंबईत विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले. हिंदी भाषेला माझा विरोध नाही, मराठी सोडून जेव्हा हिंदी कानावर येते तेव्हा त्रास होतो. गुगलला जाऊन सर्च करा तुम्हाला कळेल की, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही. आपली भाषा इतकी सुंदर, समृद्ध आहे तरीही हिंदीचा अट्टहास का होतोय? मी एक कडवट मराठी आहे. आवडेल ती भाषा शिका पण स्थानिक मराठी भाषा सोडू नका. ती तरी व्यवस्थित बोला, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
गिफ्ट सिटी असो की हिऱ्यांचा व्यापार जर गुजरातमध्ये न्यावीशी वाटते किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी पेक्षा मोठा पुतळा गुजरातमध्ये उभारावासा वाटतो, थोडक्यात काय जर देशाच्या पंतप्रधानाला त्यांच्या राज्याबद्दलचं आणि भाषेबद्दलचं प्रेम लपवता येत नाही. देशाच्या पंतप्रधानाला आपल्या भाषेबद्दल प्रेम लपवता येत नसेल तर तुम्ही का लपवता? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मराठी बोलण्याचा जे प्रयत्न करतात, त्यांची चेष्टा करू नका. सध्या आपण महाराष्ट्राकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर असलेल्या मराठी लोकांनी मराठीची, महाराष्ट्राची श्रीमंती जरूर इतर लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे. ह्या देशात राष्ट्रभाषेचा निवाडा कधीच झाला नाही. केंद्र आणि राज्य सरकार ह्यांच्यातील व्यवहारासाठी हिंदी आणि इंग्रजी ह्या भाषा वापरल्या जातात इतकंच. बाकी हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही. पण जेव्हा मी हे १५,२० वर्षांपूर्वी बोललो तेंव्हा माझ्या अंगावर सगळे धावून गेले. जेव्हा ते अंगावर आले तेव्हा त्यांना मी गुजरात हायकोर्टाचा निर्णय दाखवला. असे राज ठाकरे संमेलनात म्हणाले.
जेव्हा महाराष्ट्रात मराठी माणसाला जैन माणूस घर नाकारतो तेव्हा काय करायचं? हे गुजरात, तामिळनाडू, आसाम, केरळ ह्या राज्यात करून दाखवा. पैसे असून सुद्धा मराठी माणसाला घर नाकारायची हिंमत होते कारण आमच्या सरकारांचं बोटचेपं धोरण. मराठी माणसाकडे पैसे असताना त्याला घर नाकारलं जात असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही. आणि मराठी माणसाकडे कुठे आहे पैसा असं म्हणणारे गल्लीच्या बाहेर पण गेलेले नाहीत. त्यांना काय माहिती की महाराष्ट्रभर मराठी लोकांनी किती अफाट कर्तृत्व दाखवून पैसा उभा केलाय. भाषा मेली तर सगळंच संपलं हे विसरू नका. तुमची ओळखच तुम्ही कोणते भाषिक आहात ह्यातून होते. मराठी बोलणाऱ्यांची संख्या जर बघितली तर आपण जगात दहाव्या क्रमांकावर आहोत. थोडक्यात जगातील मोठी लोकसंख्या मराठी बोलणारी आहे. पण आम्ही आमच्याच राज्यात दुसऱ्या भाषेमध्ये गोट्यांसारखे घरंगळत का जातो.? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
‘निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर’…आरक्षण मिळाल्यानंतर किरण मानेंनी केलेली पोस्ट लक्षवेधी ‘मराठा लढतो तेव्हा इतिहास घडतोच’…आरक्षण मिळाल्यानंतर प्राजक्ता गायकवाडची खास पोस्ट