लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय शिवतारे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार होते. मात्र त्यांनी काल मोठी घोषणा करत निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी काहीसा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. सर्व पक्षांकडून निवडणुकीच्या लढाईला सुरुवात झाली आहे. त्यात आता रोहित पवार यांनी ट्विट करत बारामतीकर भाजपचे दात त्यांच्याच घशात घालून पत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत,अश्या शब्दात टीका केली आहे.
रोहित पवार यांनी एक्सवर ट्विट केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे, बारामतीतून सुप्रियाताई लढणार हे आधीच निश्चित होतं, त्यामुळं पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणण्याचे भाजपचे मनसुबे त्यांच्यासोबत गेलेले आपले लोक कदाचित यशस्वी होऊ देणार नाहीत, असं वाटत होतं. दुर्दैवाने आज भाजपची चाल यशस्वी ठरली असली तरी बारामतीची जनता स्वाभिमानी आहे. आदरणीय पवार साहेबांच्या पराभवासाठी टपून बसलेल्या भाजपच्या या खेळीला बळी न पडता बारामतीकर सुप्रियाताईंना ३ लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून देऊन भाजपचे दात त्यांच्याच घशात घालून चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास आहे, असे रोहित पवार यांनी लिहिले आहे.
बारामती मधून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा वाद सुरु आहे. अजित पवार सातत्याने मला कुटुंबातून एकटं पाडलं जात आहे, असे म्हणत भावनिक प्रचार करत नागरिकांना आव्हान करत आहेत. यावर शरद पवार गटाकडून चोख उत्तर दिले जात आहे. बारामतीमध्ये पवार विरोधात पवार असा वाद रंगल्यानंतर अजित पवार यांच्या सख्खा भाऊ सुद्धा अजित पवार यांच्या विरोधात गेला. बारामतीमध्ये ७ मे ला मतदान होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा:
प्रस्थापित आणि विस्तापित यांचा समन्वय करून ही निवडणूक लढवुया, प्रकाश आंबेडकरांनी केले मोठे दावे
देशाला विकासाच्या दिशेने न्यायचे असेल तर…मुख्यमंत्र्यांचे ठाण्यात प्रतिपादन
Follow Us