राज्यभरात रस्ते अपघात मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. डोंबिवली पूर्वेकडील चार रस्ता येथे शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रिक्षा उलटल्याने हा अपघात झाला आहे. मात्र इतर नागरिकांच्या सतर्कतेमुळे ती रिक्षा लगेच थांबवल्याने मोठे नुकसान झाले नाही. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या रिक्षातील सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पलटली , रिक्षा चालक रिक्षेच्या बाहेर फेकला गेला. त्यानंतर स्थानिक रहिवाश्यांच्या सतर्कतेमुळे रिक्षा थांबवत रिक्षेत असलेल्या तिन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढले. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकवर कारवाई करत त्याला ८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
अपघात झाला तेव्हा रिक्षामध्ये ३ मुले होती पण इतर दिवशी रिक्षामध्ये तब्ब्ल ११ मुले असतात. एवढ्या लहान मुलांना, मोठ्या प्रमाणात रिक्षात कोंबून, दाटीवाटीने बसवून त्यांना प्रवास करायला लावल्याने त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशा पद्धतीने रिक्षा चालक, धोकादायक रितीने रिक्षा चालवत असल्याच्या अनेक तक्रारी येऊनही आरटीओ अधिकारी तसेच वाहतूक पोलिसही त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे प्रवासादरम्यान लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. डोंबिवली चार रस्ता परिसरात एक रिक्षाचालक शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जात होता. मात्र रिक्षा चालकाचा अचानक ताबा सुटला आणि एक दुचाकीला धडक दिली. त्यानंतर रिक्षा चालक रिक्षेच्या बाहेर फेकला गेला. त्यावेळी रिक्षामध्ये ३ विद्यार्थी होते. त्यांच्यासह ती रिक्षा पुढे गेली.
या मोठ्या अपघातानांतर सर्वच नागरिक घाबरले. पण सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. यामध्ये रिक्षाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र धक्कादायक बाब म्हणजे या रिक्षेत मागे फक्त तीन मुले होती. मागील सीट वर जागा असतानाही एका विद्यार्थ्याला चालकाच्या बाजूला बसवण्यात आले होते.त्यामुळे हा चालक चार रस्ता परीसरात बऱ्यापैकी वाहनांची वर्दळ असताना आणि सिंगनल परीसर असतानाही वेगात रिक्षा चालवत होता का? असा प्रश्न निर्माण झाला आहे…याबाबत वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकाला वाहतुकीचे नियम तोडले म्हणून ८००० चा दंड ठोठावण्यात आला आहे. रिक्षा चालकांच्या बेदरकार पद्धतीने रिक्षा चालवणे याबद्दल तक्रारी येऊनही आरटीओ ,वाहतुक पोलिस कानाडोळा करत असल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.
हे ही वाचा:
तुळजाभवानी मातेचे अलंकार गहाळ झाल्याप्रकरणी ७ जणांवर अखेर गुन्हा दाखल, ७ पैकी ५ आरोपी मयत