२० जून २०२२ ला शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, आणि त्यानंतर स्वर्गीय आनंद दिघे यांचे दोन शिष्य २ वेगवेगळ्या वाटांना गेले. त्यापैकी एक म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे जे हिंदुत्वाची कास धरणाऱ्या, हिंदुत्वाचा गजर करणाऱ्या भाजप सोबत गेले आणि त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं तर दुसरे म्हणजे राजन बाबुराव विचारे जे उद्धव ठाकरे आणि मातोश्रीसोबत निष्ठेने राहिले आणि त्यामुळे त्यांना ठाण्याच्या रस्त्या-रस्त्यावरील संघर्ष सहन करावा लागला. तो संघर्ष सत्तेविरुद्धचा होता, तो संघर्ष निष्ठेसाठी होता. राजन विचारे (Rajan Vichare) यांना ठाण्यातून तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. सध्या राजन विचारे हे निवडणुकीच्या प्रचारात आहेत. त्यांच्यासमोर जे आव्हान आहे, ते ठाण्याचे माजी महापौर नरेश गणपत म्हस्के यांचे. हे आव्हान नेमकं कसं आहे? येणाऱ्या संघर्षाला आणि येणाऱ्या दिवसांना राजन विचारे आणि त्यांचा पक्ष विशेषतः ठाकरे कशाप्रकारे सामोरे जातील आणि हा संघर्ष कसा असणार आहे? ठाण्यातला ठाणेकर कोणाबरोबर असणार आहे? हे सर्व जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्राचे मुख्य संपादक राजेश कोचरेकर यांनी २५ ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन बाबुराव विचारे यांच्याशी बातचीत केली आहे. या विशेष मुलाखतीत राजन विचारे यांनी अनेक गोष्टींवर भाष्य करत गौप्यस्फोट केले आहेत.
तुम्हाला हॅटट्रिक करण्याची संधी पक्षाने दिली आहे. त्यात बाहेरचे वातावरण पाहता आता राजकीय क्षेत्रातसुद्धा तापलेल्या वातावरणात तुम्ही प्रचारसभा घेत आहात, या प्रचारात तुम्ही पुढाकार घेतला आहे. तर आता ठाण्याचं वातावरण कसं आहे? असा सवाल विचारल्यानंतर राजन विचारे म्हणाले की, निवडणूक आता सुरु आहेत, पहिला टप्पा पूर्ण झालाय, त्यानंतरचे २ टप्पे पूर्ण झाले आहेत. आताचे मतदार सुज्ञ आहेत. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे आता लोकांना फसवलं गेलं आहे, त्यामुळे आता जनता सुज्ञ झाली आहे. जनतेचा विश्वासघात व्हायला नकोय. सर्व ठिकाणांतील लोकांचा प्रतिसाद बघितला. ४५ डिग्री सेल्सिअस तापमान असून देखील सर्व ठिकाणी जनता उपस्थित होती. शिस्तबद्द पद्धतीने सर्व काम सुरु आहे. कार्यकर्ते रस्त्यावर उतरून प्रचार करत आहेत. ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर येथील जनता चांगला प्रतिसाद देत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी या सर्वांवर प्रेम करणाऱ्या व्यक्ती फॉर्म भरण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला.
या गद्दारीला महाराष्ट्र स्थान देणार नाही
ही लढाई निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी असणार आहे. नेहमी सत्याचा विजय होतो त्यामुळे आताही सत्याचाच विजय निश्चित आहे. राजकारणातील व्यक्तींनी गद्दारी केली, पक्ष फोडला. हे सर्व स्वतःची पापं झाकण्याकरता केलं आहे. यात कोणतं हिंदुत्व नाही, हिंदुत्वाचं प्रेम नाही. सीबीआयला घाबरून पक्षांतर झाले आहे. हा जनतेचा विश्वासघात आहे, ही गद्दारी आहे. या गद्दारीला जनता विसरणार नाही. या गद्दारीला महाराष्ट्र स्थान देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघा, त्यावेळी सुद्धा गद्दारीला थारा लागू दिला जात नव्हता. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुद्धा पहिल्यांदा गद्दारी झाली तेव्हा ते बोलले नाहीत की मला बाहेर काढा. त्यानंतर जे आंदोलन झाले त्याची टॅगलाईन होती, ‘ये जनता ही जंजीर तोडेगी’. लोकांच्या लढयामुळे दिघे साहेब बाहेर आले, पण ते कोणाच्या पायाशी गेले नाहीत, त्यांनी सगळं भोगलं पण ते कोणाकडे मदत मागायला गेले नाहीत, असा खुलासा राजन विचारे यांनी टाईम महाराष्ट्रच्या विशेष मुलाखतीत केला.
हे ही वाचा:
Eknath Shinde आणि Ajit Pawar यांना BJP कवडीची किंमत देत नाही – Bhaskar Jadhav
EXCLUSIVE CM Eknath Shinde: मोदीजी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा
Follow Us