ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या (Shrikant Shinde Foundation) नावाखाली ५०० कोटींचा गैरव्यवहार झालेला असून त्याची चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यावर आता डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांचे मानसिक संतुलन दिवसेंदिवस बिघडत चालले आहे, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केली.
ठाण्यात बोलतांना डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, ज्या प्रकारे त्यांनी पत्र लिहिले आहे ते खूप हास्यास्पद आहे. जे पत्राचाळच्या घोटाळ्यात जेलमध्ये गेले ते पत्र लिहित आहेत. फाउंडेशनच्या माध्यमातून जी चांगली कामे होत आहेत ते पत्रांमधून लिहिण्याचे काम त्यांनी केले आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे, यावरुन त्यांचा नरेंद्र मोदींवरील विश्वास वाढल्याचे दिसते आहे.ज्यांनी खिचडीमध्ये घोटाळा केला, जे पत्राचाळमध्ये जेलमध्ये गेले. खिचडी घोट्याळ्याचे ज्यांचा कुटुंबातील लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, त्यातून त्यांना कोणाला मदत केली आहे का? असा सवाल माध्यमांशी बोलतांना श्रीकांत शिंदे यांनी केला. जे पत्र्याच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांना पत्र लिहू नये. महाराष्ट्र व देश बघतो आहे की संजय राऊत यांचे मानसिक संतुलन दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यांनी चांगले हॉस्पिटल बघून उपचार करुन घ्यावेत, असे कल्याण लोकसभा महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
नेमके काय लिहिले होते पत्रात?
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे संबंध राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी असल्याने त्याबाबतचे सर्व व्यवहार हे पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे होते. या फाऊंडेशनवर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती सदस्य आहेत? फाऊंडेशनचे आतापर्यंतचे सर्व हिशेबे धर्मादाय आयुक्तांकडे सुपूर्द केले आहेत काय? याबाबत गोपनीयता बाळगली जात आहे. या फाऊंडेशनसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष उघडला आहे व त्या माध्यमातून बिल्डर, ठेकेदारांकडून रोखीत रकमा घेतल्या जातात. आतापर्यंत किमान ५०० कोटी रुपये या माध्यमातून जमा केले आहेत. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे इर्शाळवाडी येथील प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली आहे. तसेच या संकटामुळे अनाथ झालेल्या बालकांना दत्तक घेण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने स्वीकारली आहे. महाराष्ट्राला सामाजिक कार्याची मोठी परंपरा आहे. अनेक समाजसेवकांनी प्रसंगी पदरमोड करून संस्थात्मक कार्य केले आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक कार्य होत असेल तर त्यास आक्षेप असण्याचे कारण नाही. या फाऊंडेशनतर्फे अनेक शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात व ते अत्यंत भव्य स्वरूपात होतात. ते कार्य कौतुकास्पद आहेच, पण या भव्य उपक्रमावर आतापर्यंत खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचे स्रोत काय? या कार्यासाठी ज्यांनी कोट्यवधी रुपये दिले ते दानशूर कोण? याची माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे आहे.
हे ही वाचा:
संविधान बदलाबद्दल Chandrakant Patil यांचे मोठे व्यक्तव्य, डिबेट करायलासुद्धा तयार
BJP चा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’, Nana Patole यांचा घणाघात