दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आले आहे. काल दिनांक २४ मे रोजी अरविंद केजरीवाल यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. तर आज अरविंद केजरीवाल हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
काल बुधवारी (२४ मे) अरविंद केजरीवाल यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. उद्धव यांच्या भेटीत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान , आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह आणि राघव चढ्ढा आणि दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी हेही केजरीवाल यांच्यासोबत होते. तर आज अरविंद केजरीवाल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. केजरीवाल बुधवारीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन केंद्राच्या अध्यादेशाविरोधात आपच्या लढ्यात पाठिंबा मागणार आहेत. या अध्यादेशाविरोधात विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी केजरीवाल आणि मान यांनी मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथे भेट घेतली.
दिनांक १९ मे रोजी, केंद्र सरकारने भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आणि DANICS संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि प्रशासकीय कारवाईसाठी राष्ट्रीय राजधानी सार्वजनिक सेवा प्राधिकरण स्थापन करण्यासाठी अध्यादेश काढला. याच्या आठवडाभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पोलीस, नागरी सेवा आणि जमिनीशी संबंधित प्रकरणे वगळता सर्व बाबींमध्ये सेवांचे नियंत्रण दिल्लीच्या निवडून आलेल्या सरकारकडे सोपवले होते.
अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिल्ली सरकारला मिळाला खरा, पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केंद्र सरकारने अध्यादेश आणून बदलला. हा अध्यादेश राज्यसभेत रोखण्यासाठी केजरीवाल यांनी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्यात. त्याचाच भाग म्हणून ते चर्चा करणार आहेत.
हे ही वाचा:
ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी!, शुक्रवारी ठाण्यात पाणीपुरवठा बंद
पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी
आता झळकले नाना पटोलेंचे बॅनर, नक्की कोणाला मिळणार भावी मुख्यमंत्री पदाचा मान?