काल दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड ही घडली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून काढता पाय घेतला आहे. आणि आता लवकरच ते भाजप मध्ये सहभागी होणार आहे. तर नुकतंच काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकी यांनी देखील काँग्रेस मधून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी दुपारी मुंबईतील भाजप मुख्यालयात भाजपमध्ये रितसर प्रवेश केला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे समर्थक माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
यावेळी बोलत असताना अशोक चव्हाण म्हणाले आहेत की, मी कुणालाही निमंत्रित आमंत्रित केलेलं नाही. देवेंद्र फडणवीस बाकीचं पाहतील, असं अशोक चव्हाण म्हणाले. शेतकऱ्यांचे तीन कायदे रद्द केले. जनतेची भावना समजून त्यांनी हा निर्णय घेतला. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा सोडवण्यात मोदी सक्षम आहेत, असं अशोक चव्हाण म्हणाले. तसेच अशोक चव्हाण म्हणाले, विरोधात आणि सत्तेत असताना देखील फडणवीसांचे आणि आमचे राजकारणापलीकडे सबंध होते. राज्यासाठी काम करताना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे. ३८ वर्ष काँग्रेसमध्ये राहून नवीन सुरुवात करत आहे. विकासाला सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करत आहोत. देवेंद्र फडणवीसांनी नेहमी आम्हाला साथ दिली. मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेल. राज्यात आगामी निवडणुकीत भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करणार आहे.
पक्षांतराचा निर्णय घेणं सोपं नसल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. खूप विचार करावा लागला. महाराष्ट्राच्या हितासाठी, जिल्ह्याच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी निर्णय घेतला. एका दिवसात निर्णय घेतला नाही, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. मला पक्षाने खूप काही दिलं. मान्य आहे. नाकारत आहे. पण मीही पक्षासाठी खूप काही दिलं आहे. योगदान दिलं आहे. ते कुणी नाकारू शकत नाही. पण अचानक तुम्ही जर माझ्या पाठी काही करत असाल तर ते योग्य नाही. मी पार्टीला डॅमेज केलं नाही. मी फक्त वैयक्तिक निर्णय घेतला. माझं योगदान काय हे राष्ट्रीय नेतृत्व जाणून आहे, असं अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हणाले.
आदर्श घोटाळा प्रकरणी अशोक चव्हाण यांच्यावर वारंवार गंभीर आरोप झाले. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या आरोपांचं काय होणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. आदर्श घोटाळ्याचा प्रश्न उशिरा आला. पहिलाच विचारायला हवं. हायकोर्टात आमच्या बाजूने निकाल लागला आहे. तो राजकीय अपघात होता. कोर्टात प्रकरण चालू आहे. चिंतेचा विषय वाटत नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.
हे ही वाचा:
पॅराग्लायडिंगच्या पंढरीत रंगणार साहसी क्रीडाप्रकाराचा मेळा
छोट्या पडद्यावरील‘आई कुठे काय करते’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ? चर्चा सुरु