हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे स्वप्न आता पूर्ण होत असून येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ही आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असून अभूतपूर्व असा क्षण अनुभवण्यासाठी मीरा भाईंदर ते अयोध्या अशी पदयात्रा ४१ दिवसात पूर्ण करून २१ जानेवारी रोजी हे सारे अयोध्येत पोहोचणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा-भाईंदर येथे दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक हिंदूच्या मनातील राम मंदिराचे स्वप्न पूर्ण करून दाखवले असून आधी ‘हर घर मोदी’ हा नारा आता ‘मन मन मोदी’ असा बदलला असल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आवर्जून नमूद केले. काही जणांनी त्यांच्यावर ‘मंदिर वही बनाएंगे तारीख नही बताएंगे’ म्हणत टिका करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण अयोध्येत मंदिरही बनले आणि तारीखही ठरली आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांचे दात घशात घालून दाखवण्याचे काम मोदी यांनी केले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
जय श्रीराम, सियावर राम चंद्र की जय… च्या जयघोषात मीरा भाईंदर येथील रामसेना फाउंडेशनचे ३०० प्रभू श्रीराम भक्त कार्यकर्ते आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने मीरा भाईंदर ते अयोध्या हा प्रवास पायी करण्यासाठी आज मार्गस्थ झाले आहेत. यावेळी या साऱ्यांना शुभेच्छा देताना जागोजागी त्यांचे उत्साहात स्वागत करण्याचे आवाहन शिवसैनिकांना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या ३०० राम भक्तांना प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये याची सर्व खबरदारी घेण्यात आली असून, जागोजागी त्यांची जेवण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच, जमेल तिथे शिवसैनिकांनीही त्यांचे स्वागत करून त्यांना जमेल ते सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांच्याकडून करण्यात आले. २२ जानेवारी रोजी आपल्या साऱ्यांना अयोध्येत नक्की भेटू असे आश्वासन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, विक्रम प्रताप सिंह तसेच शिवसेनेचे मीरा भाईंदर येथील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
हे ही वाचा:
पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील चार विद्यार्थिंनीचा देवगडच्या समुद्रात बुडून मृत्यू
जालन्यात धनगर समाज आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग टायर पेटवून आंदोलन