शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. ते आज हजारो शेतकऱ्यांना बरोबर घेऊन नागपूर येथील विधानभवनात शिरकाव करणार आहेत, याबाबतची घोषणा त्यांनी स्वत: केली आहे. सरकारला जागं करण्यासाठी आणि त्यांच्या बुडाखाली आग लावण्यासाठी आम्ही हजारो शेतकरी नागपूरच्या विधानभवनात घुसणार आहोत, अशी प्रतिक्रिया तुपकर यांनी दिली आहे.
यावेळी रविकांत तुपकर म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर एक घोषणा केली होती की, मी मुख्यमंत्री झालो तर महाराष्ट्राचा एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. आता त्यांच्या कार्यकाळात तर दहा पटीने शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. हे सरकार लबाडाचं सरकार आहे. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, असं या सरकारचं काम आहे. बड्या बड्या बाता आणि शेतकऱ्यांना लाथा, असं यांचं काम आहे. त्यांच्यावर आता आमचा अजिबात विश्वास राहिला नाही. सोयाबीन आणि कापसाच्या भावासाठी आमचं हे पाचवं-सहावं आंदोलन आहे.” रविकांत तुपकर पुढे म्हणाले, “राज्य सरकार आणि केंद्र सरकारने दिलेल्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी आम्ही आज नागपुरला आलो आहोत. सोयाबीनचे भाव कसे वाढतील? यासाठी तुम्ही आम्हाला शब्द दिला होता. तुम्ही आम्हाला भाव नका देऊ, पण आमच्या उरावरून उठा, असं आमचं म्हणणं आहे. जी सोयाबीन यावर्षी उरणार आहे, ती तुम्ही निर्यात करा. सोयाबीन आयात करू नका. यामुळे आपसूक सोयाबीनचे भाव वाढतील. कापसाचंही तसंच आहे. कापूस निर्यात करा, पण तुम्ही कापसाचीही आयात करता.”
“आंतरराष्ट्रीय बाजारात जर कापसाचे दर कोसळले असतील तर बोनसच्या रुपात शेतकऱ्यांना मदत करा. आज समृद्धी महामार्ग तयार करण्यासाठी ५४ हजार कोटी रुपये खर्च केले. असे दहा समृद्धी महामार्ग तयार केले तरी आम्ही मरणार असू तर तुमच्या समृद्धी महामार्गावर कोण जाईल? आम्ही पेरणी नाही केली तर तुम्ही धतुरा खाणार का? तुम्ही शेतकऱ्यांच्या भरवशावर आहात. त्यामुळे या सरकारला जागं करण्यासाठी, यांच्या बुडाखाली आग लावण्यासाठी आम्ही हजारो शेतकरी नागपूरच्या विधानभवनात घुसणार आहोत,” असा इशारा तुपकर यांनी दिला आहे.
हे ही वाचा:
“संपूर्ण विश्वातील सर्वात महान मनुष्य,रितेशच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाची खास पोस्ट