नागपूर येथील रामटेक, कन्हान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जनसभा आयोजित करण्यात आली होती. महायुतीचे उमेदवार असणारे राजू पारवे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची रामटेक येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थति होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २ दिवसांपूर्वी चंद्रपूर येथील सभेत उपस्थित होते. त्यानंतर नरेंद्र मोदी यांची विदर्भातील ही दुसरी सभा आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला संबोधित केले.
आंबेडकरी जनतेची मागणी मोदींमुळे पूर्ण झाली
गरीब माणसांना नरेंद्र मोदी यांनी आधार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी असे आहेत की, त्यांना बायबल, कुराण, भगवदगीता यांच्यापेक्षाही भारताचे संविधान महत्त्वाचे आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी नरेंद्र मोदी यांनी ३ हजार कोटी रुपयांची जागा महाराष्ट्रात देण्याचे आश्वासन दिले. आंबेडकरी जनतेची मागणी मोदींमुळे पूर्ण झाली, असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विरोधक हे मोदी द्वेषाने पीडित आहेत
खूप मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येथे मोदींना ऐकण्यासाठी आला आहे. मोदींच्याप्रती सर्वांना प्रेम आहे. मोदींचा जयजयकार सगळीकडे सुरु आहे. नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्य उभं करण्याचं कार्य करत आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत, पण ते लक्ष देत नाहीत. फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल. विरोधक हे मोदी द्वेषाने पीडित आहेत. रामटेकला प्रतिअयोध्या म्हटले जाते. विरोधकांचं आयुष्य हे रोकड मोजण्यात गेले आहे. मोदींचा अजेन्डा हा देशाचा विकास आणि देशाची प्रगती हा आहे. यावर्षी नरेंद्र मोदी सर्व रेकॉर्ड मोडणार आहेत. देशातील १४० जनता मोदींसह आहे, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही
रामटेकचे पावनभूमीला माझा साष्टांग नमस्कार असे मराठीत बोलून नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली. लोकांचा उत्साह पाहून दिवस सुरु झाल्यासारखं वाटतंय. तुमच्या मोबाईलची फ्लॅश लाईट म्हणजे तुमचे आशिर्वाद आहेत, असे यावेळी नरेंद्र मोदी जनतेला उद्देशून म्हणाले. विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप होत आहेत. १९ एप्रिलला मतदान आहे, तेव्हा सर्व समजेल. मराठीत अशी एक म्हण आहे की, काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. अशाचप्रकारे, गरीबाच्या या मुलावर कितीही हल्ला केला तरीही देशाचा पंतप्रधान मागे हटणार नाही. देशाचे संविधान बदलणार अशी दिशाभूल इंडिया आघाडीने केली. भारतात पहिल्यांदाच आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर पोहचली. इंडिया आघाडीचे लोकं सनातन धर्मावरही टीका करतात. आम्ही देशाच्या जनतेची सेवा करतच राहणार आहोत. हा फक्त ट्रेलर आहे, पूर्ण पिक्चर अजून बाकी असल्याचे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.