शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (सोमवार, १५ एप्रिल) पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या (Shrikant Shinde Foundation) नावाखाली ५०० कोटींचा गैरव्यवहार झालेला असून त्याची चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याअगोदर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहीत त्याद्वारे त्यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या श्रीकांत शिंदे फाउंडेशन या संस्थेच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी, असे म्हंटले आहे. श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत होणाऱ्या उपक्रमांच्या खर्चाच्या निधीचा स्रोत काय? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, “श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या नावाखाली ५०० कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपायांची वसुली करण्यात अली आहे. याबाबत वकील नितीन सातपुते (Nitin Satpute) यांनी धर्मादाय आयुक्तांकडे माहिती मागितली आहे. गेल्या काही महिन्यानापासून ते त्याचा पाठपुरावा करत आहेत. धर्मादाय आयुक्त प्रचंड दबावलाखाली आहे. मुख्यमंत्री कार्यालायात बसून कंत्राट वाटप आणि देणग्या घेण्यात आल्या. याबाबत खरी माहिती समोर यायला हवी नाहीतर आम्हाला खोलात जावे लागेल.”
काल (रविवार,१४ एप्रिल) आपल्या “X” अकाऊंटवरून ट्विट करून याची पूर्वकल्पना दिली होती. ते म्हणाले, “चंदा दो धंदा लो! हा गोरख धंदा महाराष्ट्रातदेखील सुरु आहे काय? एकदमजोरांत! पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांना भ्रष्टाचाराचे समुळउच्चाटन करायचे आहे. लेकीन उनकेही लोग ये होने नहीं देते. मी मोदीजींना एक तक्रार केली आहे. वेट अँड वॉच.”
संजय राऊत यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
संजय राऊत यांनी आज पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहीत याची माहिती दिली. या पत्रात ते म्हणाले. “मा. प्रधानमंत्रीजी, जयहिंद ! देशातील भ्रष्टाचार, काळ्या पैशांचे व्यवहार मोडून काढण्यासाठी आपण गेल्या १० वर्षांपासून अथक परिश्रम करीत आहात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आपण जनतेला पुन्हा एकदा तेच आश्वासन दिले. त्यानिमित्त महाराष्ट्रातील काळा पैसा पांढरा करण्याचे व गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा समाजकार्याच्या नावाखाली ‘पांढरा’ करण्याचा एक धंदा मी आपल्या निदर्शनास आणत आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचा सध्या राजकीय गाजावाजा सुरू आहे. सदर फाऊंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सार्वजनिक धर्मादाय न्यासाने सखोल चौकशी करावी अशी तक्रार प्रसिद्ध वकील श्री. नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे, पण या तक्रारीस एक महिना उलटून गेला तरी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडून तक्रारीची साधी दखल घेतली गेली नाही. धर्मादाय आयुक्तांवर राजकीय दबाव असल्यामुळेच ते माहितीच्या अधिकारातही याबाबतची माहिती द्यायला तयार नाहीत असे दिसते.”
“महाराष्ट्राला सामाजिक कार्याची मोठी परंपरा आहे. अनेक समाजसेवकांनी प्रसंगी पदरमोड करून संस्थात्मक कार्य केले आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक कार्य होत असेल तर त्यास आक्षेप असण्याचे कारण नाही. या फाऊंडेशनतर्फे अनेक शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात व ते अत्यंत भव्य स्वरूपात होतात. ते कार्य कौतुकास्पद आहेच, पण या भव्य उपक्रमावर आतापर्यंत खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचे स्रोत काय? या कार्यासाठी ज्यांनी कोट्यवधी रुपये दिले ते दानशूर कोण? याची माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन अनेक गरजूंना ‘रोख’ स्वरूपातदेखील मदत करते. मनोरंजनाच्या अनेक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करते. त्यासाठी भव्य मंडप, देखावे, रोषणाई, कलाकारांचे संच ज्यांचा मेहनताना कोट्यवधीचा आहे. त्यांना बिदागीच्या रकमा कोणत्या माध्यमातून दिल्या गेल्या? त्याबाबत धर्मादाय आयुक्तांनी प्रकाश टाकायलाच हवा. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन वैद्यकीय उपक्रम घेते. वैद्यकय मोफत उपचार करते असे सांगितले गेले. ते उपक्रम नक्कीच वाखाणण्यासारखे आहेत, पण याबाबत ज्यांनी देणग्या दिल्या त्यांची पार्श्वभूमी काय? ते तपासणे गरजेचे आहे. ज्यांनी देणग्या दिल्या ते मुख्यमंत्री कार्यालयाचे लाभार्थी आहेत काय?”
“श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे संबंध राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी असल्याने त्याबाबतचे सर्व व्यवहार हे पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे होते. या फाऊंडेशनवर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती सदस्य आहेत? फाऊंडेशनचे आतापर्यंतचे सर्व हिशेबे धर्मादाय आयुक्तांकडे सुपूर्द केले आहेत काय? याबाबत गोपनीयता बाळगली जात आहे. या फाऊंडेशनसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष उघडला आहे व त्या माध्यमातून बिल्डर, ठेकेदारांकडून रोखीत रकमा घेतल्या जातात. आतापर्यंत किमान ५०० कोटी रुपये या माध्यमातून जमा केले आहेत. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे इर्शाळवाडी येथील प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली आहे. तसेच या संकटामुळे अनाथ झालेल्या बालकांना दत्तक घेण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने स्वीकारली आहे. सदर बाब ही माणुसकी धरूनच आहे, परंतु अशा कार्यासाठी खूप मोठा निधी लागतो. सदर निधी ज्या देणगीदारांकडून प्राप्त झाला असेल त्यांचा योग्य सन्मान आणि त्यांच्या दातृत्वाची पुरेशी प्रसिद्धी होणे उचित ठरेल, परंतु सदर उपक्रम हाती घेताना शासकीय निधीचा वापर करून जर कोणी राजकीय व्यक्ती त्याचे श्रेय घेत असेल तर ते नुसते अनैतिक नसून गुन्हेगारी स्वरूपाचेदेखील आहे. यास मराठीमध्ये मेलेल्या माणसांच्या टाळूवरील लोणी खाणे असे म्हणतात. नागरिकांना गणपतीच्या सणासाठी गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणात त्यांच्या गाड्या श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला उपलब्ध करून दिल्याचे वर्तमानपत्रातून समजले. सदर गाड्यांचे पैसे प्राप्त झाले आहेत किंवा नाही याची माहिती करदात्या नागरिकांस होणे आवश्यक आहे. कारण जर पैसे प्राप्त झाले नसतील तर हा शासकीय निधीचा गैरवापर असून त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. जर निधी प्राप्त झाला असेल तर श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून निधीच्या देणगीदारांची नावे प्रसिद्ध होणे किंवा नागरिकांना सदर बाब समजणे आवश्यक आहे. देणगीदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला कोणत्या कारणासाठी पैसे देतात की धार्मिक बाब म्हणून कोट्यवधी रुपयांची दक्षिणा देतात, याचा खुलासा आवश्यक आहे.”
हे ही वाचा:
संविधान बदलाबद्दल Chandrakant Patil यांचे मोठे व्यक्तव्य, डिबेट करायलासुद्धा तयार
BJP चा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’, Nana Patole यांचा घणाघात