देशाचा अर्थसंकल्प म्हणजे देशाचे आर्थिक खाते. दरवर्षी भारतातील अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर केला जातो आणि २०२३चा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पण, दरवर्षी आपल्या कानावर पडणाऱ्या बजेट या शब्दाची उत्पत्ती नक्की कुठून झाली? किंवा मग भारतात पहिले बजेट कधी सादर हे तुम्हाला माहितीये का? म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत याच बजेटचा इतिहास…
बजेट शब्द नक्की आला कुठून?
बजेट हा शब्द फ्रेंच शब्द बगेट (Bougette) पासून आला आहे. बगेट (Bougette) म्हणजे चामड्याची ब्रीफकेस. यापूर्वी भारतातही अर्थमंत्री चामड्याच्या ब्रीफकेसमध्ये अर्थसंकल्पाची कागदपत्रे घेऊन संसदेत जात असत. पूर्वीसुद्धा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी एक फोटोशूट केले जायचे. ज्यात अर्थमंत्री त्यांच्या कनिष्ठ मंत्र्यांसह हातात ब्रीफकेस घेऊन फोटो काढायचे. या ब्रीफकेसमध्ये महसूलाच्या पावत्या आणि खर्चाची कागदपत्रे असत आणि त्याच ब्रीफकेसमध्ये अर्थमंत्र्यांचे भाषण असायचे जे ते संसदेत वाचायचे. अर्थसंकल्पाची कागदपत्रे ठेवायला वापरण्यात येणारी ही ब्रीफकेस तपकिरी रंगाची असायची, जी अगदी ब्रिटिश काळापासून चालत आली आहे. बजेट हा शब्द संविधानात कोठेही नाही, पण ही परंपरा सुरुवातीपासून चालत आलेली आहे, त्यामुळे बजेट हा शब्द आजही वापरात आहे.
बजेट शब्दाचा अर्थ काय?
बजेट हा सरकारच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा लेखाजोखा असतो, जो पुढील एका वर्षासाठी निश्चित केलेला असतो. एका अंदाजानुसार, सरकार ठरवते की एका वर्षात किती खर्च केला जाईल आणि विविध स्त्रोतांमधून किती कमाई केली जाईल. पाहायचं झालं तर सरकार व्यतिरिक घरच्या खर्चबद्दल बोलताना आपणही बजेट हा शब्द सातत्याने वापरत असतो. म्हणजे घरचे उत्पन्न किती आहे आणि किती खर्च करायचा आहे याचा अंदाज आपण घरचं बजेट तयार करताना करत असतो. म्हणूनच बजेट हा शब्द केवळ सरकारच्या कामकाजात नव्हे तर कोणत्याही व्यक्तीसाठी, व्यक्तींच्या गटासाठी, कोणताही व्यवसाय करण्यासाठी किंवा जिथे उत्पन्न आणि खर्चाचा हिशेब ठेवायचा आहे त्यासाठी वापरला जातो.
सर्वात आधी भारतात बजेट कुणी सादर केले?
भारताचा पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन यांनी १८६० मध्ये सादर केला होता. पीसी महलानोबिस यांना भारतीय अर्थसंकल्पाचे जनक म्हटले जाते. एका अंदाजानुसार बजेट हे तीन प्रकारचे असते – बॅलेंस्ड बजेट, सरप्लस बजेट आणि डेफिसिट बजेट.अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री खर्च इच्छिणाऱ्या सर्व मंत्रालयांचा सल्ला घेतात. सर्व मंत्रालये त्यांच्या खर्चानुसार अर्थ मंत्रालयाला अर्थसंकल्पीय वाटपाचा अंदाज पाठवतात. या आधारावर सर्वसाधारण अर्थसंकल्पात खर्चाचा अंदाज मांडला जातो.
हे ही वाचा:
माजी आरोग्य मंत्र्यांच्या गाडीला अपघात, मानेला व पाठीला दुखापत
निवडणूक आयोगाच्या सुनावणी आधी अनिल देसाईंची प्रतिक्रिया