आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. लवकरच देशात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मात्र त्यातच आता पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे (MNS leader Vasant More) यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे सगळीकडे जोरदार चर्चांना उधाण आले आहे. वसंत मोरे यांच्या पक्षातील वरिष्ठांचे सर्वकाही अलबेल नाही, असे यावरून आता स्पष्ट झाले आहे. मध्यरात्री १२ वाजता वसंत मोरे यांनी पोस्ट लिहिली. त्यांनी लिहिलेल्या पोस्टनंतर सगळीकडे चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.
मनसे नेते वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे, एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही, असे लिहून सोशल मीडियावर शेअर केले आहे. वसंत मोरे हे मनसेचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या कामातून वेगळा ठसा उमटवला होता. तसेच त्यांनी मनसेची शहरामध्ये वाढ होण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. वसंत मोरे यांची तरुणाईमध्ये मोठी क्रेज आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पक्षातील नेत्यांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या पोस्टमुळे सगळीकडे खळबळ निर्माण झाली आहे. एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो, असे वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
वसंत मोरे यांची खासियत म्हणजे, कुठेही अन्याय होवो, त्या ठिकाणी मोरे लगेच हजर राहतात. कोणतीही समस्या आपल्या स्टाईलने सोडवणे आणि धडाडीने काम करणे ही वसंत मोरे यांची खासियत आहे. मात्र आता जनतेचे प्रश्न सोडवणाऱ्या वसंत मोरे यांना स्वतःला कुणाचा त्रास आहे? त्यांना कोणता त्रास आहे? त्यांची कोंडी कुणी करतंय? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या तयारीला देखील सुरुवात केली आहे.
हे ही वाचा:
भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात धडकणार, नंदुरबारमधून सभेला सुरूवात