वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद संकुलात तब्बल ३१ वर्षांनंतर पूजा होत आहे. गुरुवार दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी लोक पूजेसाठी तळघरात पोहोचले. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात बुधवारी (३१ जानेवारी) न्यायालयाने हिंदूंना आवारात असलेल्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार देण्याचे आदेश दिल्याने हिंदू पक्षाला मोठा दिलासा मिळाला. ज्ञानवापी व्यासांच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदूंना मिळाला आहे.
न्यायालयाने वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना हिंदू बाजूने आणि श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टने नामनिर्देशित पुजारी यांच्यामार्फत पूजा आयोजित करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. १७ जानेवारी रोजी, वाराणसी जिल्हा न्यायालयाने जिल्हा दंडाधिकारी यांची रिसीव्हर म्हणून नियुक्ती केली आणि त्यांना तळघर सुरक्षित ठेवण्याचे आणि त्यात कोणतेही बदल न करण्याचे निर्देश दिले. २४ जानेवारी रोजी, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी प्रकाश चंद्र यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाच्या पथकाने डीएमला तळघराचा रिसीव्हर बनवून त्यांच्या ताब्यात घेण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली.
ज्ञानवापी प्रकरणात, वाराणसीचे डीएम एस राजलिंगम यांनी ‘व्यास का तहखाना’मध्ये हिंदू बाजूने पूजा करण्याची परवानगी दिल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. वाजुखान्यासमोर बसलेल्या नंदी महाराजांसमोरील बॅरिकेड्स हटवून मार्ग खुला करण्याबाबत त्यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, ‘न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे.’ सध्या ज्ञानवापी कॅम्पसभोवती सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. पूजेला परवानगी मिळाल्यानंतर संकुलात उपस्थित असलेल्या एका भक्ताने सांगितले की, न्यायालयाच्या आदेशाने आम्ही खूप आनंदी आणि भावूक झालो आहोत. आमच्या आनंदाला सीमा नाही.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वाराणसी न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आणि सांगितले की बुधवारी न्यायाधीशांच्या निवृत्तीचा शेवटचा दिवस होता. १७ जानेवारी रोजी रिसीव्हरची नियुक्ती करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाचा निकाल आधीच लागला होता. ते म्हणाले की, हे प्रार्थनास्थळ कायद्याचे पूर्ण उल्लंघन आहे. जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार या कायद्याबाबत मौन सोडत नाही, तोपर्यंत असे प्रकार होतच राहतील.
हे ही वाचा:
अशोक सराफ यांचा जीवनप्रवास,आणि मजेशीर किस्से
Manipur violence : मणिपूर मध्ये हिंसाचाराचे सत्र सुरूच, गोळीबारात २ मृत्यू