हिंदू धर्मात, कोणत्याही शुभ कार्यात, धार्मिक कार्यक्रमात किंवा उत्सवादरम्यान गणेशाचे प्रथम पूजन केले जाते. सर्वांचे विघ्न दूर करणारा विघ्नहर्ता लवकरच भक्तांच्या भेटीला येत आहे. गणरायाच्या आगमनाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. आज लाडक्या गणपती बाप्पाबाबत अशा काही गोष्टी जाणून घेऊ; ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील.
गणरायाला हत्तीचे डोके का असते? (Why does Ganaraya have the head of an elephant?)
हिंदू पौराणिक कथेनुसार देव गणेश हा भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र असल्याचे मानले जाते. गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीच्या जन्माचा उत्सव आहे. त्यामागची कथा निश्चितपणे तुम्ही ऐकली असेल. पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वतीने स्नानासाठी जात असताना आपल्या अंगावरील मळापासून एक लहानशा मुलाची मूर्ती तयार करून, त्यात प्राण टाकले होते. मग देवी पार्वती आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षाबाहेर पहारा देण्यास या लहान मुलाला सांगते आणि कोणालाही आत प्रवेश न देण्याची सूचना देते. त्याप्रमाणे हा मुलगा आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करतो आणि कक्षाबाहेर पहारा देत असतो. त्याच वेळी महादेव देवी पार्वतीला भेटण्यासाठी तिथे येतात. त्या क्षणी गणेश आणि महादेव दोघेही एकमेकांना ओळखत नसतात. त्यामुळे तो लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यास मनाई करतो. महादेवदेखील ते मान्य करीत नाहीत आणि हा लहान मुलगाही मागे हटत नाही. त्यामुळे महादेवांना राग अनावर होतो आणि दोघांमधील वाद टोकाला जातो. मग शंकर आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करतात. तोपर्यंत माता पार्वती स्नान आटोपून बाहेर येते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून अत्यंत दुःखी आणि संतप्त होते. आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा हट्ट ती भगवान शंकराकडे धरते. त्यावेळी भगवान शंकर त्याच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वांत पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचे डोके आणण्यास सांगतात. त्यानुसार देवतांना हत्तीचे डोके सापडते. अखेर भगवान शंकर ते हत्तीचे डोके त्या लहान मुलाच्या धडाला जोडतात आणि श्रीगणेशाचा जन्म होतो, अशी ही कथा आहे.
गणरायाने लिहिले महाभारत? (Ganaraya wrote the Mahabharata?)
गणरायाने महाभारत हे महाकाव्य लिहिले, असे मानतात. गणेशाबाबत एक लोकप्रिय कथा सांगितली जाते की, व्यास ऋषींना महाभारत लिहिण्यासाठी एका प्रवीण लेखकाची आवश्यकता होती. गणेशाने त्यांना लिहिण्यास सहमती दर्शविली; परंतु ती एका अटीवर. जोपर्यंत त्याचे लेखन पूर्ण होत नाही तोपर्यंत व्यास ऋषी थांबणार नाहीत, अशी ती अट होती. ऋषी व्यासांनीही ते मान्य केले; पण त्यांनीही एक अट घातली की, गणेश जोपर्यंत श्लोक समजत नाही तोपर्यंत लिहिणार नाही. म्हणून जेव्हा व्यासांना थोडी विश्रांती हवी असे तेव्हा ते फक्त काही अवघड श्लोक सांगायचे; जे गणेशाला काही काळ गोंधळात टाकत.
गणरायाला एकदंत का म्हणतात? (Why is Ganaraya called Ekdanta?)
तुम्ही जर कधी गणपतीची मूर्ती काळजीपूर्वक पाहिली असेल, तर तुम्हाला त्याचा एक दात तुटलेला आहे, असे लक्षात येईल. गणरायाला ‘एकदंत’ असे म्हटले जाते. एकदंत या नावामागे दोन कथा आहेत. त्यापैकी एका कथेनुसार गणपती जेव्हा महाभारत लिहीत होता तेव्हा तो ज्या मोर पंखाने लिहीत होता, तो मध्येच तुटतो. म्हणून सतत लिहिण्याच्या अटीवर टिकून राहण्यासाठी, गणपती त्याचा स्वत:चा दात तोडतो आणि अखंड लेखन करीत राहतो. दुसऱ्या एका कथेनुसार गणेशाने भगवान परशुरामांना शिव निवासात प्रवेश करू दिला नाही आणि ध्यानात व्यग्र असलेल्या भगवान शिवाला भेटू दिले नाही. त्यावेळी संतप्त परशुरामने गणपतीचा एक दात तोडला होता. तेव्हापासून त्याला ‘एकदंत’ म्हटले जाते.
गणेशाचे वाहन उंदीर का आहे? (Why is Ganesha’s vehicle a rat?)
उंदीर हे गणेशाचे वाहन मानले जाते. एका कथेनुसार गणेश ज्या उंदरावर स्वार होतो, तो एक गर्विष्ट असुर होता; ज्याचा पराभव गणेशाने केला होता. यामागेही दोन समज आहेत. प्रथम, प्राचीन काळी जेव्हा शेती हे उदरनिर्वाहाचे प्राथमिक साधन होते, तेव्हा उंदीर हा समृद्धीतील सर्वांत मोठा अडथळा होता; जसा तो आजही शेतकऱ्यांसाठी अडथळा आहे. पिकांची नासाडी करणे, साठवून ठेवलेले धान्य खाणे हे उंदरांचे दिवसभराचे काम आहे. भगवान गणेशाने उंदरालाच वाहन केल्याने प्रतीकात्मकपणे या प्राण्यावर विजय मिळविल्याचे दर्शवते आहे. अशा प्रकारे तो विघ्नांचा नाश करणारा म्हणून त्याला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाऊ लागले. दुसरे म्हणजे भगवान गणेश जगाच्या सर्व कोनाड्यांपर्यंत पोहोचू शकला आणि अडथळ्यांचा नाश करणारा विघ्नहर्ता म्हणून आपले कर्तव्य बजावू शकला. कारण- त्याचे वाहन उंदीर होते; जो लहान छिद्रे आणि अरुंद मार्गांवरूनही जाऊ शकते.
शुभ कार्यापूर्वी गणरायाचे का केले जाते पूजन? (Why Ganaraya is worshiped before auspicious work?)
”गजानना श्री गणराया, आधी वंदू तूज मोरया!” कोणतेही शुभ कार्य असो नेहमी गणेशाचे प्रथम पूजन केले जाते. हिंदू परंपरांमध्ये लग्नाचे पहिले आमंत्रण गणपतीला दिले जाते. घराच्या किंवा कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती किंवा चित्रेही तुम्ही पाहिली असतील; ती विनाकारण नाहीत. धर्मानुसार गणेशाला देवांनी आशीर्वाद दिलेला आहे की, नेहमी प्रथम आणि इतर कोणत्याही देवाच्या आधी तुझी पूजा केली जाईल. त्याला विघ्नहर्ता म्हणतात; कारण- भक्तांचे सर्व अडथळे तो दूर करतो. म्हणूनच एखाद्या शुभ गोष्टीच्या सुरुवातीला तो नेहमीच पूजनीय असतो; जेणेकरून कार्यक्रमादरम्यान कोणतेही अडथळे येऊ नयेत. पण तुम्हाला माहीत आहे का की, गणरायाला हा प्रथम पूजनाचा मान कसा मिळाला? यामागे एक कथा आहे. एका कथेनुसार एकदा गणेश आणि त्याचा भाऊ कार्तिकेय यांच्यात सर्वश्रेष्ठ कोण, असा वाद झाला. मग अखेर सर्वश्रेष्ठ कोण हे ठरवण्यासाठी दोघांमध्ये स्पर्धा आयोजित केली गेली. स्पर्धा अशी होती की, जो कोणी तीन वेळा जगाची प्रदक्षिणा पूर्ण करील, तो जिंकेल. कार्तिकेयने पटकन आपले वाहन मोरावर बसून पृथ्वीची प्रदक्षिणेस सुरुवात केली. पण, गणेश एकदम निवांत होता. त्याने जगाला प्रदक्षिणा घालण्याऐवजी आपल्या पालकांना म्हणजेच शिव-पार्वतीभोवती फक्त तीनदा चक्कर मारली. जेव्हा त्यांना असे करण्याचे कारण विचारले जाते तेव्हा गणरायाने सांगितले की, त्याचे आई-वडील हेच त्याच्यासाठी जग आहे. अशा प्रकारे आई-वडिलांभोवती चक्कर मारून त्याने तीन वेळा जगाभोवतीची चक्कर पूर्ण केली आणि स्पर्धा जिंकली. यावेळी गणरायाला आशीर्वाद मिळतो की, कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणेशपूजन केले जाईल.
हे ही वाचा:
मराठी लिटिल चॅम्प्सच्या सेटवर अशोक मामा झाले भावुक…