सभागृहात एका मागून एक नेत्यानी आपले भाषण केले. यावेळी अनेकांनी आपल्या मनातील भावनांना वाट करून दिली. विरोधी पक्षनेते म्हणून निवड झालेल्या अजित पवार यांनीही आपले भाषण सादर केले. यावेळी पाहिले कौतुक त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केले.
अजित पवार काय म्हणाले ?
अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले, एकनाथ शिंदे यांना मी २००४ पासून पाहतो आहे. मागच्या इतक्या वर्षात त्यांचं असं भाषण मी कधीच ऐकलं नाही. अजित पवारांनी आपल्या भाषणात एकानाथ शिंदे यांच्या भाषणाचे कौतुक केले. जवळपास २००४ ते २०२२ पर्यंत एकनाथ शिंदे यांचं मनमोकळं भाषण मी आज पहील्यांदाच ऐकलं. शिंदे बोलत असताना मी त्यांच्या एकदा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि एकदा फडणवीस यांचे हावभाव पाहत होतो. फडणवीसांचा चेहराच सांगत होता की बास आता, थांबा शिंदे साहेब एखादा शब्द जास्तीचा निघाला तर पंचाईत होईल. असे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. अजित पवारांचे हे वाक्य ऐकून सभागृहात एकच हशा पिकला. शिंदे साहेबांची गाडी अगदी सुसाट सुटली होती की थांबायचं नावच घेत नव्हती. भाषण करताना जेव्हा समोरून टाळ्या पडायला लागतात तेव्हा वक्ता बोलत जातो, नंतर कधी घसरतो हे त्याचं त्यालाच कळत नाही. तसं काही आपल्या मुख्यमंत्र्यांचं पहिल्या भाषणात होऊ नये म्हणून केवढी ती काळजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत होते. पुढे अजित पवार म्हणाले, “ठीक आहे त्यांनी मन मोकळं केलं. अनेक आरोप प्रत्यारोप झाले. बातम्या आल्या, अनेक वक्तव्यं करण्यात आली. शेवटी माणसाचं मन आहे ते दुखावलं जाणारच. ज्यांच्यासाठी आपण कष्ट घेतो. मेहनत घेतो त्यांच्याकडून मन दुखावलं गेलं तर ते जीवाला लागतं”.
अजित पवार असं ही म्हणाले की, लोकशाहीत मुख्यमंत्री पदाबरोबरच विरोधी पक्षनेते ही जबाबदारी तितकीच महत्वाची आहे. माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. राज्यातील प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आम्ही नक्की करणार. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते पदाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणार. असं अजित पवार म्हणाले.