सध्या राज्यात उन्हाचा तडाखा खूप जास्त प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे रोज बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाचा सामना करावा लागत आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (RAJ THACKERAY) यांनी ‘एक्स’ (X) या सोशल माध्यमाद्वारे एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांबाबत काळजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो. अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्या बाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी. तसचं उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील ह्याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचं नियोजन करता येईल.
प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत
माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वत:ची काळजी घ्या. तसेच ह्या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत) आणि निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा. आणि प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत. त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅलरीत, गच्चीत पाणी ठेवा.
हे ही वाचा:
देशाला PM Modi यांच्यासारख्या खमक्या नेतृत्वाची गरज – Ajit Pawar
Sangali मध्ये MVA मध्ये बंडखोरी, Vishal Patil यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल