आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात धामधूम सुरु आहे. राज्यात विविध पक्षातील नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप, टीकाटिपण्या करत आहेत. अश्यातच, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर टीका करत, “आपल्या दहा वर्षाच्या कार्यकालातील आठ वर्षे मोदींच्या नेतृत्वातील सत्तेत असूनही स्थानिक खासदार विनायक राऊत हे विकासाच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरले.” असते म्हंटले आहे. आशिष शेलार हे आज (शनिवार, १३ एप्रिल) एकदिवसीय सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आशिष शेलार म्हणाले, “रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाला मोठी परंपरा आहे. बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू ते डॉ. निलेश राणे यांनी आपापल्या कार्यकाळात या मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. मात्र, आपल्या दहा वर्षाच्या कार्यकालातील आठ वर्षे मोदींच्या नेतृत्वातील सत्तेत असूनही स्थानिक खासदार विनायक राऊत हे विकासाच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरले. शैक्षणिक व्यवस्थेपासून ते रोजगारापर्यंत कोणतेही भरीव कार्य ते करू शकले नाहीत, त्यांचा पराभव अटळ आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
शेलार पुढे म्हणाले की, “शिवसेना व राष्ट्रवादीत पडलेली फुट ही त्यांच्या नेतृत्वाच्या स्वार्थ व अहंकारातून पडली आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत मते आमच्यासोबत मागितली व मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीची सोबत केली. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा शब्द त्यांनी दिला होता. तो शब्द न पाळता स्वार्थी हेतून स्वतः मुख्यमंत्री झाले. त्यातूनच त्यांचा पक्ष फुटला. तर दुसरीकडे स्वतःच्या मुलीला पक्षाचे नेतृत्व देण्यातून राष्ट्रवादीची शकले झाली. यात भाजपचा काय दोष असा सवाल करतानाच मी म्हणेन तेच खरे व मी घेईन तोच निर्णय योग्य अशी भूमिका घेणारे उद्धव ठाकरे हे देशातील सर्वात अहंकारी नेते आहेत,” असा आरोप आशिष शेलार यांनी केला.
शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका करत ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका करणे, टोमणे मारणे याची सुरुवात ही उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनीच केली. अहंकार व अतिआत्मविश्वास यामुळेच त्यांचा व त्यांच्या पक्षाचा घात झाला. फौजा, खंजीर, बाप कोणी काढले हे सर्वज्ञात आहे.”
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोदी सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्री आहेत. ते महायुतीचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी जर स्वतः प्रचाराची धुरा हाती घेतली असेल तर ती स्वागतार्ह बाब आहे. केंद्राच्या माध्यमातून झालेला विकास व स्थानिक खासदारांचे अपयश ते प्रभावीपणे येथील जनतेपर्यंत मांडू शकतात. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात कोकणात निश्चितच परिवर्तन घडेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.